नाशिककर धन्यवाद : मतदानानंतर मतमोजणीही शांततेत; पोलीस प्रशासनाला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 00:10 IST2019-05-23T23:59:35+5:302019-05-24T00:10:32+5:30
गुरुवारी शहरासह ग्रामीण भागातील मतदानाची मोजणी करण्यात आली. निवडणुकांचे निकाल जाहीर होणार असल्याने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी तत्पूर्वी सूक्ष्म नियोजन करत सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक पोलीस आपापल्या हद्दीत तैनात केले होते.

नाशिककर धन्यवाद : मतदानानंतर मतमोजणीही शांततेत; पोलीस प्रशासनाला यश
नाशिक : शहरासह जिल्ह्यात मतदानप्रक्रियेसह मतमोजणीही गुरुवारी (दि.२३) शांततेत पार पडली. शहर पोलीस आयुक्तालय व ग्रामीण पोलीस मुख्यालयस्तरावर सुक्ष्म नियोजन करत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कायदासुव्यवस्था अबाधित राहिली. नाशिककर जनतेने पोलीस प्रशासनाच्या कामगिरीविषयी समाधान व्यक्त केले आहे. शहरासह जिल्ह्यात निमलष्करी दलाच्या जवानांसह राज्य राखीव दलाच्या तुकड्या व अतिरिक्त पोलिसांचा फौजफ ाटा पहारा देत होता.
शहर व ग्रामीण भागात २९ एप्रिलरोजी लोकसभा निवडणुकीची मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. यावेळी तीन हजारांपेक्षा अधिक पोलीसांचे बळ तैनात करण्यात आले होते. गुरुवारी शहरासह ग्रामीण भागातील मतदानाची मोजणी करण्यात आली. निवडणुकांचे निकाल जाहीर होणार असल्याने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी तत्पूर्वी सूक्ष्म नियोजन करत सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक पोलीस आपापल्या हद्दीत तैनात केले होते. वैयक्तिकरीत्या बंदोबस्ताची आखणी करून त्यानुसार उपआयुक्त, उपअधीक्षक, सहायक आयुक्त सहायक उपअधीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली संवेदनशाील भागात तसेच राजकीय पक्षांचे कार्यालये, निवासस्थाने, मतमोजणी केंद्र परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. २९ एप्रिलपासून अंबड येथील मतमोजणी केंद्रात जिल्ह्यातील ईव्हीएम यंत्रे निमलष्करी जवानांच्या सुरक्षेखाली बंदिस्त ठेवण्यात आली होती. या केंद्राला सशस्त्र निमलष्करी जवानांचा वेढा होता. गुरुवारी सकाळी मतमोजणीला प्रारंभ होऊन रात्री उशिरापर्यंत शांततेत मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. मतमोजणी केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. रात्री उशिरा बारा वाजता मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होताच पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचा-यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
संवेदनशील भागावर विशेष नजर
पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांना ‘अॅलर्ट’देत नांगरे-पाटील यांनी सराईत गुन्हेगारांची धरपकड करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. शहरात सर्वत्र चोख बंदोबस्तात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. तसेच शहरातील पंचवटी, भद्रकाली, अंबड, सातपूर, नाशिकरोड, इंदिरानगर यांसारख्या पोलीस ठाणेहद्दीतील संवेदनशाील भागावर पोलिसांची विशेष नजर होती. रात्रीची गस्त वाढवून परिसरात कायदासुव्यवस्था धोक्यात आणू पाहणा-या संभाव्य संशयितांची धरपकड करण्यात आली.