‘त्या’ तलाठी, बॅंकांना बजावणार नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:19 IST2021-08-28T04:19:29+5:302021-08-28T04:19:29+5:30
मालेगाव : संजय गांधी योजनेसह सर्व अर्थसाहाय्य योजनेतील लाभार्थींशी प्रशासनासह संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्यांनी संवेदनशील ...

‘त्या’ तलाठी, बॅंकांना बजावणार नोटिसा
मालेगाव : संजय गांधी योजनेसह सर्व अर्थसाहाय्य योजनेतील लाभार्थींशी प्रशासनासह संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्यांनी संवेदनशील राहून समन्वय साधत न्याय देण्याचे काम करावे, असे आवाहन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. दरम्यान, बैठकीत अपर जिल्हाधिकाऱ्यांनी संजय गांधी योजनेत विलंब करणाऱ्या तलाठी, बँकांना नोटिसा बजावणार असल्याचे सांगितले.
शासकीय विश्रामगृहातील सभागृहात राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेच्या लाभार्थींना अर्थसाहाय्याचे धनादेश भुसे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी आढावा बैठकीत भुसे बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपविभागीय अधिकारी डॉ.विजयानंद शर्मा, तहसीलदार किशोर मराठे, नायब तहसीलदार (संगायो) विकास पवार, बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे यांच्यासह संजय गांधी योजनेचे नवनियुक्त सदस्य उपस्थित होते. आढावा बैठकीला ज्या बँकेचे प्रतिनिधी अनुपस्थित होते, त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत मंत्री भुसे म्हणाले, स्थानिक राष्ट्रीयीकृत बँकांनी आपल्या शाखेत लाभार्थींचे खाते उघडण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. संगायोसारख्या अर्थसाहाय्य योजनेतील लाभार्थींसाठी आपल्या बँकेत स्वतंत्र कक्ष स्थापन करून त्यांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी. योजनेतील महिला लाभार्थींना सन्मानाची वागणूक देण्यात यावी. या योजनेतील प्रत्येक लाभार्थी हा वयोवृद्ध असल्यामुळे त्यांच्या विषयी संवेदनशील राहून त्यांची कामे प्राधान्याने करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. गत दोन वर्षांमध्ये मंजूर झालेल्या प्रकरणातील बरेच लाभार्थी हे मिळणाऱ्या लाभापासून वंचित आहेत त्याची चौकशी करून आवश्यक त्रुटींची पूर्तता करून लाभार्थींना न्याय देण्यासाठी मोहीम स्वरूपात कामकाज करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी तालुकास्तरीय संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष प्रमोद पाटील, सदस्य भगवान मालपुरे, महेंद्र साळुंखे, सुनील पगार, गोरख शेवाळे, नाना निकम, दीपक तलवारे, अण्णा पवार आदी उपस्थित होते.
----
प्रत्येक गाव, गटनिहाय माहिती
अर्थसाहाय्य योजनेतील लाभार्थींच्या कामासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी बँकांसह तलाठ्यांनी प्राधान्यक्रम ठरविण्याचे आवाहन करताना अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम म्हणाले, संजय गांधी योजनेतील लाभार्थींना दरमहा मिळणारे अर्थसाहाय्य विलंबाने प्राप्त होण्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यासाठी प्रत्येक गाव व गटनिहाय माहिती संकलित करून होणारा विलंब ज्या तलाठ्यांमुळे व ज्या बँकेमुळे होत असेल त्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ नोटीस बजावण्यात यावी, अशा सूचनाही अपर जिल्हाधिकारी निकम यांनी यावेळी दिल्या.
-----------
मालेगावी संजय गांधी निराधार योजनेचा आढावा घेताना कृषिमंत्री दादा भुसे. समवेत अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम आदी. (२७ मालेगाव भुसे)
270821\27nsk_47_27082021_13.jpg
२७ मालेगाव भुसे