येवला तालुकावासीयांचा पाण्यासाठी टाहो
By Admin | Updated: April 2, 2016 00:02 IST2016-04-01T23:41:54+5:302016-04-02T00:02:20+5:30
विहिरींनी गाठला तळ : घोटभर पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती

येवला तालुकावासीयांचा पाण्यासाठी टाहो
पाटोदा : येवला तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पाण्यासाठी तालुक्यातील नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे पाणी मिळेल का नाही, हा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे. संपूर्ण तालुक्यातील जनता पाण्यासाठी टाहो फोडत आहे. तालुक्यातील नद्या, नाले व ओढे गेली तीन वर्षांमध्ये एकदाही भरले नाहीत. या गंभीर परिस्थितीमुळे तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याकरिता नागरिकांना भटकंती करावी लागत आहे व आपली तहान भागवण्यासाठी मिळेल तेथून पाणी आणावे लागत असल्याने लहान मुलांसह वृद्धांनाही पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. एवढी भीषण परिस्थिती असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे व कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही.
सध्या ग्रामीण भागात सण, उत्सव, लग्नसराई कार्यक्रमाकरिता घरी आल्यानंतर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. त्यात भर म्हणून भारनियमनाच्या वेळेत वाढ झाल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे.
तालुक्यातील पाण्याची पातळी प्रचंड खोलवर गेली आहे.
सर्व पाण्याचे स्रोत कोरडेठाक
पडले आहेत. असे असतानाही शेतकऱ्यांनी बोअरवेल घेऊन जमिनीची चाळण केली आहे; मात्र पाणी लागत नाही. ९०० / १००० फुटापर्यंत बोअर घेऊनही पाणी लागत नसल्याने नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार, अशी अवस्था झाली आहे.
तालुक्यात गतवर्षी व यंदाही कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. ज्यांच्याकडे थोड्या फार प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, अशा लोकांनी पाण्याचा व्यवसाय चालू केला असून, नागरिकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात आहे. पण याबाबत बोलतंय कोण? जो कोणी बोलतो त्याला पाणीच बंद असा फतवाच काढला आहे. तांब्याभर पाणी व पोटभर जेवण दिल्यास पुण्याचे सार्थक होते. पण सध्याची परिस्थिती पाहता ती मोडीत निघाली आहे. विकत पाणी मिळेना मग फुकट कोण देणार. (वार्ताहर)