जादा विषयांवरून संशयकल्लोळ
By Admin | Updated: April 22, 2016 23:25 IST2016-04-22T23:25:58+5:302016-04-22T23:25:58+5:30
स्थायी समिती : सभागृहाला अंधारात ठेवत विषयांना मंजुरी

जादा विषयांवरून संशयकल्लोळ
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत सभापतींनी जादा विषयांचे वाचन न करताच सभागृहाला अंधारात ठेवत त्यांना मंजुरी दिल्याने संशयकल्लोळ निर्माण होऊन गदारोळ उठला. दरम्यान, स्थायीच्या सभेत डी. पी. रोड आणि न्यायालयीन निकालाशी संबंधित भूसंपादनांच्या प्रस्तावांना मंजुरी देताना उर्वरित सुमारे सव्वाशे कोटी रुपयांचे भूसंपादनाचे प्रस्ताव तहकूब ठेवले.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेत भूसंपादनाचे सुमारे १३५ कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. यावेळी दिनकर पाटील यांनी सर्व्हे नंबर २०१ आणि २२२ मधील आरक्षित जागांच्या संपादनाची प्रक्रिया १९९९ पासून सुरू असल्याचे आणि त्याबाबत अद्याप कार्यवाही पूर्ण झाली नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. भूसंपादनाचे प्रस्ताव प्रलंबित ठेवणाऱ्या संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या निश्चित करण्याची मागणीही पाटील यांनी केली. प्रकाश लोंढे यांनी भूसंपादनाकरिता यावर्षीसाठी १२४.५० कोटी रुपयांची तरतूद असताना उर्वरित रकमेची तरतूद कोठून करणार, असा सवाल केला.
यशवंत निकुळे यांनी डीपीरोड, न्यायालयीन निकाल यामुळे संबंधित भूसंपादनांचे प्रस्ताव मंजूर करणे गरजेचे असल्याचे सांगितले, तर अशोक सातभाई यांनी आरक्षित जागांचा वापर सुरू असल्याने संबंधित जमीनमालकांना मोबदला देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. यावेळी मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी यावर्षी भूसंपादनाकरिता १२४.५० कोटी रुपयांची तरतूद असल्याने तेवढी देयके देता येतील. परंतु इतर देयके एकतर थकीत राहतील किंवा जसे उत्पन्न मिळेल तशी देयके अदा करता येतील, असे सांगितले.
सभापती सलीम शेख यांनी कलम १२७ अंतर्गत असलेले न्यायालयीन निकालासंबंधीचे प्रस्ताव आणि डीपीरोड संबंधित प्रस्ताव मंजूर करत उर्वरित भूसंपादनाचे प्रस्ताव तहकूब ठेवले. भूसंपादनाच्या प्रस्तावावरील निर्णय देतानाच सभापतींनी जादा विषयांनाही मंजुरी देत असल्याचे सांगत सभा गुंडाळली. जादा विषयांचे सभागृहात वाचन न करताच सभापतींनी त्यांना मंजुरी दिल्याने दिनकर पाटील, प्रकाश लोंढे, संजय साबळे, मनीषा हेकरे यांनी त्यास आक्षेप घेतला. परंतु सभापतींनी सभा संपल्याचे सांगत विरोधकांच्या गदारोळाकडे दुर्लक्ष केले आणि सभागृह सोडले. या गदारोळामुळे लक्ष्मण जायभावे यांना गढूळ पाण्यासंबंधीचा विषय मांडण्याची संधी मिळू शकली नाही. (प्रतिनिधी)