जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा; वीज पडून चार जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:58 IST2019-04-15T00:56:56+5:302019-04-15T00:58:23+5:30
नाशिक : जिल्ह्यात रविवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने तिघा विद्यार्थ्यांचे बळी घेतले आहे. दिंडोरी तालुक्यातील मौजे मानोरी येथील तीन मुले वीज पडून ठार झाली. वीज पडल्याने दिंडोरी तालुक्यात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मृतात सागर गणपत गवे, अनिल विश्वनाथ गवे व रोहित हिरामण गायकवाड यांचा समावेश आहे. अन्य घटनेत महिलेचा मृत्यू झाला. वीज पडून चांदवङ तालुक्यातील खडकओझर येथील जनाबाई सुभाष गिरी (४०) या महिलेचा मृत्यू झाला.

नाशिकमध्ये इंदिरानगर येथे झाड पडून दोन कारचे नुकसान झाले. तसेच पुणे जिल्ह्यात शेलपिंपळगाव येथे पावसाने उन्हाळी बाजरी भुईसपाट झाली.
नाशिक : जिल्ह्यात रविवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने तिघा विद्यार्थ्यांचे बळी घेतले आहे. दिंडोरी तालुक्यातील मौजे मानोरी येथील तीन मुले वीज पडून ठार झाली. वीज पडल्याने दिंडोरी तालुक्यात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मृतात सागर गणपत गवे, अनिल विश्वनाथ गवे व रोहित हिरामण गायकवाड यांचा समावेश आहे. अन्य घटनेत महिलेचा मृत्यू झाला. वीज पडून चांदवङ तालुक्यातील खडकओझर येथील जनाबाई सुभाष गिरी (४०) या महिलेचा मृत्यू झाला.
दिंडोरी तालुक्यातील मौजे मानोरी येथे मुले क्रिकेट खेळत असताना विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचावासाठी तीन युवक कडुलिंबाच्या झाडाखाली आडोशाला लपले असता अंगावर वीज पडून तिघेही ठार झाल्याची घटना घडली.
घटनेचे वृत्त समजताच तहसीलदार बाबासाहेब गाढवे, पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने मानोरी गावावर शोककळा पसरली.
चाळिशी गाठल्यामुळे उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली, एवढेच नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी उत्सुक असलेल्या कार्यकर्त्यांचाही या पावसामुळे हिरमोड झाला. गेल्या तीन दिवसांपासून हवामानात कमालीचा बदल झाला असून, कडक ऊन पडून नागरिक घामाघूम होत असताना रात्री थंड वारे वाहू लागले. त्यातच अधूनमधून आकाशात ढग गर्दी करू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी चांदवड, येवला व सिन्नर तालुक्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली तर वादळाने अनेक घरांचे नुकसान केले. बदलत्या हवामानाचा शेतकऱ्यांनी धसका घेतला असताना रविवारी दुपारनंतर अचानक पुन्हा आकाशात ढगांची गर्दी होऊन हवा बंद झाली. सायंकाळी पाच वाजेनंतर सोसाट्याचा वारा सुटला व विजेचा कडकडाट करीत पावसाने जोरदार हजेरी लावली. नाशिकसह चांदवड, दिंडोरी तालुक्यात काही ठिकाणी पावसाने झोडपून काढले. दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथे यमुनाबाई भाऊसाहेब गुंजाळ यांच्या शेतात वीज पडून गाय मरण पावली. नाशिक तालुक्यातील पिंपळद येथेही वीज कोसळून दोन गायी मृत्युमुखी पडल्या आहेत.