समाजमान्यतेच्या शिक्क्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 01:49 IST2017-08-06T01:48:41+5:302017-08-06T01:49:03+5:30

समाजमान्यतेच्या शिक्क्यासाठी
साराश/ किरण अग्रवाल
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणूक निमित्ताने उडालेली रणधुमाळी जिल्ह्यातील समाजकारण व राजकारणही घुसळून काढणारी आहे. कारण, राजकारण अगर सहकारात उंचीपर्यंत पोहोचलेल्या उमेदवारांचेही या संस्थेतील स्वारस्य टिकून असल्याचे दिसून येत आहे. शिवाय, पदाधिकाºयांमधीलच नव्हे तर तालुका प्रतिनिधींमधील लढतीही चुरशीच्या होऊ घातल्या आहेत. परिणामी यंदाची निवडणूक अधिक उत्कंठावर्धक
ठरली आहे.
शिक्षण क्षेत्रात राजकारण आणू नये असे लाख बोलले जात असले तरी, निवडणूक येते तेथे राजकारण आल्याखेरीज राहत नाही. त्यातही जेव्हा एखादी संस्था प्रस्थापित असते व त्या संस्थेतील प्रतिनिधित्व हे समाजमान्यतेचे मापदंड मानले जाते, तेव्हा तर अशा संस्थेत जाण्यासाठी रस्सीखेच होणे अगदी स्वाभाविक असते. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीकडे त्याचदृष्टीने पाहता येणारे आहे.गौरवमयी शतकोत्तर वाटचाल करीत असलेल्या नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने जिल्ह्याच्याच नव्हे तर संपूर्ण राज्यातील शैक्षणिक परिघावर आपली नाममुद्रा उमटविली आहे. राज्यात ‘रयत’नंतर दुसºया क्रमांकाची मोठी शैक्षणिक संस्था असा लौकिक कमावलेल्या ‘मविप्र’ संस्थेच्या शाळा-महाविद्यालयांमधून तब्बल दोन लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून, सुमारे दहा हजारांवर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आपली सेवा देत आहेत. स्व. रावसाहेब थोरात, काकासाहेब वाघ, भाऊसाहेब हिरे, अण्णासाहेब मुरकुटे, गणपत दादा मोरे, डी. आर. भोसले, कीर्तिवानराव निंबाळकर, विठोबा पाटील-जाधव, विठ्ठलराव गाढवे, कृष्णराव कोठावदे, अजबा पाटील यांसारख्या द्रष्ट्या समाज धुरिणांनी, कर्मवीरांनी पुढाकार घेत स्थापलेल्या या संस्थेद्वारे तळागाळातील सामान्यांपर्यंत शिक्षणाची गंगा प्रवाहित होत आहे. दरम्यानच्या काळात स्व. अॅड. बाबूराव ठाकरे, अॅड. विठ्ठलराव हांडे, डॉ. वसंतराव पवार, डॉ. दौलतराव अहेर आदिंनीही या संस्थेला भरभराटीस आणण्यासाठी आपले अमूल्य योगदान दिले. त्यामुळे ही संस्था नावारूपास आली असून, त्यात संचालक वा पदाधिकारी असणे हे समाजमान्यतेचे लक्षण समजले जाऊ लागले आहे. त्यामुळेच ‘मविप्र’च्या निवडणुकीला एखाद्या साखर कारखान्याच्या निवडणुकीपेक्षाही मोठे महत्त्व प्राप्त झालेले दिसून येते. यात प्रत्येकवेळी निवडणूक लढण्यासाठी उत्सुक राहिलेल्या मान्यवरांची वाढती संख्या पाहता त्यातून संस्थेचे महत्त्व अधोरेखित व्हावेच, शिवाय निवडणुकीच्या अनुषंगाने होणारे आरोप-प्रत्यारोप बाजूला ठेवून विचार करताही संस्थेच्या सत्तेत जाण्यासाठी एवढी अहमहमिका व्हावी, यातूनही संस्थेची मातब्बरी दृगोचर व्हावी.यंदाही या संस्थेसाठी दोन पॅनल्समध्ये सरळ लढत होऊ घातली असून, सत्ताधारी सरचिटणीस नीलिमाताई पवार यांचे ‘प्रगती’ व अॅड. नितीन ठाकरे, माजी खासदार प्रतापराव सोनवणे यांच्या नेतृत्वातील समाजविकास पॅनल आमने-सामने आहेत. अर्ज माघारी वगैरे प्रक्रिया आटोपून गेल्याने आता प्रचाराची रणधुमाळी वेग घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे, सत्ताधाºयांनी शिरीषकुमार कोतवाल, अंबादास बनकर, रवींद्र देवरे, नानाजी दळवी, मुरलीधर पाटील, भरत कापडणीस व स्व. डॉ. वसंतराव पवार यांच्याशी कायम एकनिष्ठ राहिलेल्या कृष्णा भगत अशा सात विद्यमान संचालकांचा पत्ता कापला गेल्याने त्यांची नाराजी कुणाच्या पथ्यावर पडते व कुणास नुकसानदायी ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे. अर्थात, कोतवाल यांची उमेदवारी कापताना त्यांचे व्याही उत्तम भालेराव व दिलीप पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नातेसंबंधांच्या मर्यादा पाळल्या जातात की त्यापलीकडचा विचार केला जातो हे पाहणे लक्षवेधी ठरले आहे. गेल्यावेळी विरोधात लढलेले माणिकराव बोरस्ते यंदा ‘प्रगती’चे उमेदवार बनले आहेत. त्यामुळे ‘जोड-तोड’चे राजकारण प्रकर्षाने समोर येऊन गेले आहे.महत्त्वाचे म्हणजे, गेल्यावेळी १८ पैकी १५ जागा मिळवून नीलिमातार्इंनी सत्ता राखली होती. या संस्थेतील कर्ते नेते डॉ. वसंतराव पवार यांच्या अवघ्या १८ महिन्यांपूर्वी झालेल्या अकाली निधनाची पार्श्वभूमी व त्याबद्दलची सहानुभूती त्या निकालामागे होती. यंदा मात्र कामाचेच बळ कामी येण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकतेची त्रिसूत्री घेऊन ‘प्रगती’ पॅनल प्रचारात उतरले आहे. तर विरोधी ‘समाजविकास’ पॅनलने सत्ताधाºयांवर एकाधिकारशाहीचा आरोप चालविला आहे. ‘प्रगती’मधून ज्येष्ठ, जाणत्यांचे कापले गेलेले पत्ते यासंदर्भात बोलके ठरले आहेत. त्यामुळे प्रचारातील मुद्द्यांनी तालुक्या-तालुक्यातले समाजकारण ढवळून निघत आहे. यात आवर्जून दखल घेण्यासारखी बाब म्हणजे, राजकारण टाळता येणारे नसले तरी पक्षीय अभिनिवेश मात्र बाजूला ठेवून सारे लढत आहेत. राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार एका पॅनलमध्ये, तर राष्टÑवादीचेच युवक शाखेचे जिल्हाध्यक्ष सचिन पिंगळे समोरच्या पॅनलमध्ये आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील व गेली विधान परिषदेची निवडणूक लढलेले डॉ. प्रशांत पाटील ‘प्रगती’च्या व्यासपीठावर दिसत आहेत, तर प्रतापराव सोनवणे, अॅड. नितीन ठाकरेंसमवेत अद्वय हिरे ‘समाजविकास’साठी झटत आहेत. निफाड तालुक्यातील दिलीप बनकर व अनिल कदम हे तर पारंपरिक विरोधक. एकमेकांविरुद्ध विधानसभेची निवडणूक लढलेले. परंतु ते सत्ताधाºयांच्या व्यासपीठावर एकत्र वावरताना दिसत आहेत. त्यामुळे आपापले राजकीय जोडे बाजूला काढून ही सर्व मातब्बर मंडळी या निवडणुकीत उतरली आहे. याखेरीज प्रत्यक्षपणे या निवडणुकीत न उतरलेलेही अनेक नेते आहेत, ज्यांनी राजकारण अगर सहकाराचा आपला ‘आखाडा’ सोडून शैक्षणिक संस्थेत लुडबूड न करण्याची भूमिका वरकरणी प्रदर्शिली आहे. परंतु समर्थकांच्या विजयासाठी वा तालुकास्तरीय राजकारणातून प्रतिस्पर्ध्याला शह देण्यासाठी ते पडद्यामागून भूमिका बजावण्याची शक्यता नाकारता येणारी नाही. त्यामुळे आगामी काळात प्रचारातील रंगत वाढण्याचीच शक्यता आहे. अर्थात, परस्परांसमोर उभ्या ठाकलेल्या दोन्ही पॅनल्सच्या नावात ‘प्रगती’ व ‘विकास’ असा संस्थेला पुढे घेऊन जाण्याचीच भूमिका असलेला समान धागा आहे. त्यामुळे निवडणुकीचे रण जोरात असले तरी कसोटी मतदारांचीच लागणार आहे.