सजावटीसाठी कारागिरांची शहरात कमतरता
By Admin | Updated: August 13, 2014 00:41 IST2014-08-13T00:35:37+5:302014-08-13T00:41:04+5:30
गणेशोत्सव : परजिल्ह्यातून देखाव्यांसह कारागिरांचीही आयात; मूर्तीही येतायेत मुंबईतून

सजावटीसाठी कारागिरांची शहरात कमतरता
मनोज मालपाणी ल्ल नाशिकरोड
गणेशोत्सवासाठी चलत देखावे, आरास बनविणाऱ्या मूर्तिकार, कलाकारांची संख्या घटल्याने शहरातील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना देखाव्यासाठी इतर जिल्ह्यांत फिरण्याची वेळ आली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नगर येथील डेकोरेशनचे सेट महागडे मिळत असल्याने यंदा कोणता देखावा उभारावा, असा प्रश्न मंडळाच्या कार्यकर्त्यांपुढे निर्माण झाला आहे.
शहर परिसरात काही वर्षांपूर्वी अनेक मूर्तिकार भव्य चलत डेकोरेशन सेट तयार करीत होते. थर्माकॉलचेदेखील भव्य सुंदर देखाव्यांचे सेट उभारत होते. मात्र गणेशोत्सव, नवरात्रोत्सव देखाव्यांवर वर्षभराचा संसाराचा गाडा हाकणे कठीण झाल्याने मूर्तिकार देखावे बनविण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.
त्याचप्रमाणे खरेदी केलेला देखावा, मूर्ती वर्षभर सांभाळून ठेवणे जागेअभावी मंडळांनादेखील अडचणीचे होऊ लागल्यात्यांनी ही देखावे विकत घेणे टाळले आहे. तसेच प्लॅस्टर आॅफ पॅरिसमध्ये बनविलेल्या मूर्ती वजनाने जड व नाजूक असल्याने मंडळांनीदेखील प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या देखाव्यांना नापसंती दाखवत फायबरमध्ये बनविलेले देखावे तसेच मूर्ती घेण्यास सुरुवात केली आहे.
भाडेतत्त्वावर देखावे
फायबरमध्ये बनविलेली मूर्ती, देखावा, आर्थिकदृष्ट्या महागात पडत असल्याने मूर्तिकार, कलाकारांकडून ती गणेशोत्सव काळात भाडेतत्त्वावर देण्यात येऊ लागली. मात्र फायबरमधील मूर्ती, देखाव्याकरिता मूर्तिकारांना मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते. शिवाय जागेची गरज व सहकलाकार, मूर्तिकारांची गरजही लागते. फायबरच्या मूर्ती व देखाव्यासाठी लागणारी मोठी आर्थिक गरज, जागा, सहकारी कलाकारांचा तुटवडा अशा अनेक कारणांमुळे गणेशोत्सवाचे देखावे, आरास तयार करणारे मूर्तिकार, कलाकार गेल्या काही वर्षांत कमी होऊ लागले आहेत. शहरात हातावर मोजण्याइतकेच मूर्तिकार देखावे आरास तयार करण्याचे काम करीत आहेत. यामुळे शहरातील मंडळांना यंदा गणेश उत्सव देखावा, आरास मिळणे अवघड झाल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तसेच मुंबई, ठाणे, कल्याण, नगर, पुणे आदि ठिकाणी वणवण भटकण्याची पाळी आली आहे. गणेशोत्सव १५ दिवसांवर येऊन ठेपला असून, बहुतांश मंडळांना अद्यापही देखावा न मिळाल्याने ‘यंदा काय करावे’ असा प्रश्न मंडळ व कार्यकर्त्यांपुढे उभा राहिला आहे.