शिवसेनेचा स्वबळावर लढण्याचा नारा
By Admin | Updated: January 20, 2017 00:20 IST2017-01-20T00:19:55+5:302017-01-20T00:20:10+5:30
बागलाण : ताहाराबाद येथे संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत बैठक

शिवसेनेचा स्वबळावर लढण्याचा नारा
सटाणा : बागलाण तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरून कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस यांनी आघाडीची बिघाडी होण्याचे संकेत दिले आहेत, तर भाजपा व सेनेमध्येही युतीसाठी अनुकूल वातावरण नसून त्यांच्यामध्येही मानसन्मानावरून तणातणी सुरू असल्याचे चित्र असून, सेनेचे संपर्कप्रमुख सुहास सामंत यांनी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी शिवसैनिकांना स्वबळाचा नारा देतानाच, इच्छुकांनी वेळ न दवडता प्रचाराला लागावे, असे आवाहन केले आहे. संपर्कप्रमुखांच्या या आवाहनामुळे भाजपा व शिवसेना युतीची शक्यता धूसर झाली आहे.
ताहाराबाद येथे सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बागलाणमध्ये भाजपा व मित्रपक्षांशी युती करायची की स्वबळावर लढायचे याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांशी विचारविनिमय करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे, सुभाष नंदन, शरद शेवाळे, नामपूर बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब कापडणीस, पप्पू बच्छाव उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी विधानसभा निवडणुकीत दिलेल्या उमेदवाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पालिका निवडणुकीत भाजपाशी युती करण्यासंदर्भात स्थानिक पदाधिकाऱ्यांशी अखेरपर्यंत बोलणी सुरू होती. मात्र ऐनवेळी दोन-तीन जागा देण्याची भाषा करून आपली फसवणूक केली. त्यामुळे स्वबळावर लढण्याचा पवित्रा उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिकांनी घेतला. भाजपाने ब्राह्मणगाव, पठावे दिगर, ताहाराबाद, वीरगाव असे तीन गट सेनेला सोडून सन्मानाने युती करावी, असा प्रस्ताव नंदन यांनी ठेवला.