राष्ट्रवादीपुढे शिवसेनेचे आव्हान; गटपातळीवर नेत्यांचीच प्रतिष्ठा लागणार पणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:16 IST2021-09-26T04:16:09+5:302021-09-26T04:16:09+5:30
योगेंद्र वाघ लाेकमत न्यूज नेटवर्क येवला : येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय हालचाली गतिमान ...

राष्ट्रवादीपुढे शिवसेनेचे आव्हान; गटपातळीवर नेत्यांचीच प्रतिष्ठा लागणार पणाला
योगेंद्र वाघ
लाेकमत न्यूज नेटवर्क
येवला : येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय हालचाली गतिमान होत आहेत. विद्यमान सदस्यांसह इच्छुकांचीही मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुढे शिवसेनेचे आव्हान असून गटपातळीवर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
तालुक्याच्या राजकारणावर प्रारंभापासून काँग्रेस त्यानंतर राष्ट्रवादी असा प्रभाव राहिला आहे. परिणामी जिल्हा परिषद, पंचायत समितीवर अपवाद वगळता काँग्रेस-राष्ट्रवादीचेच वर्चस्व कायम राहिले आहे. गत निवडणुकी दरम्यान छगन भुजबळ तुरुंगात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वहिन झाली, परिणामी राष्ट्रवादीच्या ताब्यात असणारी पंचायत समितीची सत्ता शिवसेनेने खेचून घेतली. भुजबळांच्या गैरहजेरीत झालेल्या या निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी असली तरी सर्व धुरा ॲड. माणिकराव शिंदे, अंबादास बनकर यांच्यावरच होती. शिंदे यांना मुलगा ॲड. शाहू यांच्यासाठी अंदरसुल गटातून उमेदवारी हवी होती; मात्र पक्षाने संधी दिली नाही. ॲड. शाहू यांनी निवडणूक दरम्यान सायगाव पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता; मात्र माघारीच्या मुदतीत अर्ज मागे घेतला. यात ॲड. शिंदे आणि परिवाराची नाराजी मात्र लपून राहिली नाही. तर ॲड. शिंदेही निवडणुकी दरम्यान प्रत्यक्ष प्रचारात सक्रिय दिसून आले नाहीत. बनकर यांच्या मुलाला पाटोदा गटातून उमेदवारी मिळाल्याने बनकर गटात अडकून पडले. राष्ट्रीय काँग्रेस तालुक्यात क्षीण झालेली होती. परिणामी राष्ट्रवादीच्या सर्वच उमेदवारांना आपल्या बळावरच निवडणुकीला सामोरे जावे लागले. सुप्रिया सुळे यांची अंदरसुल गटात एक सभा वगळता इतर कुणी नेतेही राष्ट्रवादीसाठी तालुक्यात फिरकले नाही. परिणामी राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेच्या २ तर पंचायत समितीच्या ३ अशा अवघ्या पाच जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीच्या तुलनेत शिवसेनेकडे माजी आमदार मारोतराव पवार, युवा नेते संभाजी पवार, नरेंद्र दराडे, किशोर दराडे हे नेते संघटितपणे होते. जोडीला शिवसैनिकांचे बळ असल्याने या नेत्यांनी आपले गट-गण राखतांना इतर गट-गणांचीही बेरीज जुळवून आणली. परिणामी जिल्हा परिषदेच्या ३ तर पंचायत समितीच्या ७ जागा मिळवत शिवसेनेने पंचायत समितीची सत्ता खेचून घेतली. ग्रामीण भागात संघटन वा सक्षम नेतृत्व नसताना या निवडणुकीत भाजपाने केंद्रीय नेतृत्वाचा फायदा होईल असा विचार करून स्वबळाचा नारा दिला; मात्र भाजपाला पूर्ण जागांवर उमेदवार देता आले नाही की, गट- गणाची एक जागाही मिळवता आली नाही.
राष्ट्रवादीच्या संजय बनकर यांना जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे तर शिवसेनेच्या सुरेखा दराडे यांना महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद मिळाले आहे. पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात असली तरी प्रारंभीचा विरोध वगळता तालुका पातळीवर समजुतीचे राजकारण पंचायत समितीत सुरू राहिले आहे.
आता तालुक्याच्या राजकारणाचे चित्र पुन्हा बदललेले दिसणार आहे. भुजबळ निर्दोष मुक्त झाल्यानंतर येवला दौऱ्यावर आले असता ॲड. माणिकराव शिंदे यांनी भुजबळ यांच्या अभिनंदनाचे फलक तर लावलेच पण जाहीर सत्कारही केला. त्यामुळे शिंदे यांना पुन्हा भुजबळ बरोबर घेतात का? ही चर्चा तालुक्यात रंगते आहे. तालुक्यात पवारांचा नगरसुल गट, दराडेंचा राजापूर गट, बनकरांचा मुखेड गट, सोनवणेंचा अंदरसुल गट तर पाटोदा गट कायम बदल घडवणारा अशी जिल्हा परिषद गटांची ओळख आहे. जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकीत पक्षापेक्षा नेत्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागते. तर भुजबळांमुळे विकास हा निवडणुकीत मुख्य मुद्दा ठरतो.
राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असली तरी तालुक्यात महाविकास आघाडीचा प्रयोग होईल असे वाटत नाही. शिवसेना- भाजपा युतीही राहिलेली नसल्याने सर्वच पक्ष स्वबळावर लढले तर भुजबळांचा प्रभाव राहील असे सध्याचे राजकीय चित्र आहे. जिल्हा परिषद- पंचायत समिती गट, गणांच्या आरक्षण सोडतीनंतर उमेदवार आणि राजकीय गणिते स्पष्ट होणार आहेत.
इन्फो...
जिल्हा परिषद गट/पक्षनिहाय सदस्य -
पाटोदा - संजय अंबादास बनकर (राष्ट्रवादी काँग्रेस) नगरसुल - सविता बाळासाहेब पवार (शिवसेना)
राजापूर - सुरेखा नरेंद्र दराडे (शिवसेना)
अंदरसुल - महेंद्रकुमार केशरचंद काले (राष्ट्रवादी काँग्रेस)
मुखेड - कमल भाऊसाहेब आहेर (शिवसेना) पंचायत समिती गण/पक्षनिहाय सदस्य -
पाटोदा - सुनीता अशोक मेंगाणे (राष्ट्रवादी काँग्रेस)
धुळगाव - मोहन खंडू शेलार (राष्ट्रवादी काँग्रेस)
सावरगाव - आशाताई कांतीलाल साळवे (शिवसेना) नगरसुल - ॲड. मंगेश दत्तात्रय भगत (शिवसेना)
राजापूर - लक्ष्मीबाई बाबू गरूड (शिवसेना)
सायगाव - रुपचंद रामचंद्र भागवत (शिवसेना)
अंदरसुल - नम्रता विजय जगताप (शिवसेना)
नागडे - प्रवीण रघुनाथ गायकवाड (शिवसेना)
चिचोंडी खुर्द - कविता नारायण आठशेरे (शिवसेना)
मुखेड - अनिताबाई नवनाथ काळे (राष्ट्रवादी काँग्रेस)
फोटो - २५संजय बनकर
२५सविता पवार
२५सुरेखा दराडे
२५महेंद्रकुमार काले
२५कमल आहेर