शेतकरी आंदोलनावरील परिसंवादाने संमेलनाला राजकीय फोडणीचा वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:21 IST2021-02-23T04:21:00+5:302021-02-23T04:21:00+5:30
नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमपत्रिकेला अद्याप अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही. मात्र, यंदाच्या संमेलनात कोरोनाबाबतचा परिसंवाद, ...

शेतकरी आंदोलनावरील परिसंवादाने संमेलनाला राजकीय फोडणीचा वास
नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमपत्रिकेला अद्याप अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही. मात्र, यंदाच्या संमेलनात कोरोनाबाबतचा परिसंवाद, तसेच देशातील शेतकरी आंदोलनाबाबत दोन तासांचा परिसंवाद रंगणार असल्याचे अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले. संमेलनात शेतकरी आंदोलनावर चर्चा करण्याची घोषणा झाल्याने आता संमेलनाला आपसूकच राजकीय फोडणीचा वास येऊ लागला आहे.
भुजबळ फार्म हाऊस येथे झालेल्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा करण्यात आल्याने या चर्चेला अधिकच जोर आला आहे. ठाले पाटील शनिवारपासून नाशिक दौऱ्यावर आले असून, रविवारी त्यांनी पालकमंत्री भुजबळ यांच्यासमवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. साहित्य संमेलनाचे उद्घाटक हे साहित्यिकच राहणार असले तरी ते कोण राहणार याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नसून, त्याबाबतची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचेही ठाले पाटील यांनी नमूद केले. साहित्य संमेलनांमधील परिसंवाद, त्यातील वक्ते, निमंत्रित कवी याबाबतची घोषणाही लवकरच करण्यात येणार आहे, तसेच संमेलनासाठीच्या निमंत्रणांसाठीदेखील १५ मार्चपर्यंत डेडलाइन देण्यात आली असून, त्यापूर्वी सर्व निमंत्रणे रवाना करण्याचे निर्देश दिल्याचेही ठाले पाटील यांनी सांगितले. साहित्य महामंडळ हे काळाबरोबर चालणारे असल्याने यंदाच्या संमेलनात कोरोनाविषयक, तसेच शेतकरी आंदोलनाबाबत प्रत्येकी २ तासांचे परिसंवाद रंगणार असल्याचे ठाले पाटील यांनी नमूद केेले. शेतकरी आंदोलनावर व्यापक परिचर्चा व्हावी, म्हणून याबाबतचा परिसंवाद हा मुख्य मंडपात घेण्यात येणार असल्याचेही ठाले पाटील यांनी नमूद केले.
इन्फो
कामाचे अधिक विकेंद्रीकरण करावे
नाशिककरांनी या काळात संमेलन घेऊन एक मोठे धाडस केले आहे. तरीदेखील आतापर्यंत झालेल्या आढाव्यात सर्व कामे ही योग्य प्रकारे मार्गी लागली असली तरी कामाचे अधिक विकेंद्रीकरण करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कामाला गती मिळू शकणार असल्याचेही ठाले पाटील यांनी सांगितले.
इन्फो
बहिष्कार घालूनही गतवर्षी साडेचार कोटींची पुस्तक विक्री
साहित्य संमेलनाच्या स्टॉल्ससाठी ६,५०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. त्यात कोणतीही कपात होणार नसून, काही प्रकाशकांनी गतवर्षीच्या उस्मानाबाद संमेलनावर बहिष्कार घातला होता. स्वत: स्टॉल्स न घेऊन इतरांच्या स्टॉल्समधून पुस्तक विक्री केली. तरीदेखील त्या संमेलनात ४.५ कोटींची पुस्तक विक्री झाल्याचेही ठाले पाटील यांनी नमूद केले.