समृद्धी महामार्ग प्रकल्पग्रस्त स्वत:च लढा देण्याच्या तयारीत
By Admin | Updated: September 6, 2016 01:42 IST2016-09-06T01:41:18+5:302016-09-06T01:42:03+5:30
समृद्धी महामार्ग प्रकल्पग्रस्त स्वत:च लढा देण्याच्या तयारीत

समृद्धी महामार्ग प्रकल्पग्रस्त स्वत:च लढा देण्याच्या तयारीत
घोटी : शासनाच्या प्रस्तावित समृद्धी महामार्ग व स्मार्ट सिटीच्या निर्मितीसाठी इगतपुरी तालुक्यातील बावीस गावांतील सुपीक शेतजमीन संपादित करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने या रस्त्याला आणि नोड प्रकल्पाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी कडवा विरोध केला असून, याबाबत नाराजीचे धुमारे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहेत. या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात जमिनी जाणार असल्याने तालुक्यातील शेतकरी देशोधडीला लागनार असल्याने कोणत्याही स्थितीत जमिनी देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान, या शेतकऱ्यांच्या पाठीशी राजकीय पक्ष खंबीर पणे उभे असल्याचा दिखाऊपणा तालुक्यात पाहण्यास मिळत असून, इतर तालुक्याच्या तुलनेत या तालुक्यात कोणताही राजकीय पक्ष आतापर्यंत शेतकऱ्याच्या पाठीशी रस्त्यावर उतरला नसल्याने राजकीय पक्ष दिखाऊपणा करीत असल्याचे स्पष्ट होत आहे.
इगतपुरी तालुक्यातील बावीस गावे या प्रकल्पामुळे बाधित होत असून या तालुक्याला छेदून हा रस्ता जात असल्याने आधीच विविध प्रकल्पांसाठी जमिनी देणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना या प्रकल्पामुळे भूमिहीन होण्याची वेळ येणार आहे. याच तालुक्यात शेणवड बु व कवडधरा या दोन ठिकाणी प्रत्येकी बाराशे हेक्टर जमिनीवर स्मार्ट सिटी उभारण्यात येणार असून यासाठी जमिनी घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याने तालुक्यातील शेतकरी संभ्रमात पडला आहे.
अश्रू पुसण्यासाठी कोणीच नाही
निवडणुकीच्या काळात मतांचा जोगवा मागण्यासाठी गावोगाव फिरणाऱ्या राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी तर केवळ प्रसिद्धी साठी या प्रकल्पाला दिखाऊ विरोध दर्शवित आपले प्रसिद्ध झालेले फोटो सोशल मीडियावर टाकून धन्यता मानत असल्याचे ही दिसून येते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्ष या शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे नाटक करीत असल्याने शेतकरी स्वत:चा लढा स्वत:च लढण्याच्या तयारीत आहेत.