खडक सुकेणे उजव्या कालव्याच्या पुलाची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 00:58 IST2021-03-31T23:22:28+5:302021-04-01T00:58:02+5:30
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील खडकसुकेणा गावालगत असलेल्या उजव्या कालव्यावरील पूल हा धोकादायक बनला असतानाच, वारंवार त्याविषयी तक्रार करूनही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत असून, लोकांचा बळी गेल्यावर संबंधित विभागाला जाग येईल का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

खडक सुकेणे उजव्या कालव्याच्या पुलाची पडझड
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील खडकसुकेणा गावालगत असलेल्या उजव्या कालव्यावरील पूल हा धोकादायक बनला असतानाच, वारंवार त्याविषयी तक्रार करूनही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत असून, लोकांचा बळी गेल्यावर संबंधित विभागाला जाग येईल का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
दिंडोरी तालुक्यातील खडकसुकेणे गावापासून ब्रिटिशकालीन उजवा कालवा जातो. त्या कालव्यावरून एक पूल आहे. त्यांची संपूर्णत: पडझड झाली असून, दोन्ही बाजूच्या कथड्यांची पडझड झाली आहे. आधीच अरुंद पूल आणि त्यात कठडे नाहीत व मधोमध पुलाला भगदाड, यामुळे दोन्ही बाजूने वाहने आल्यास वाहने कालव्यामध्ये पडून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. पुलाला मधोमध भगदाड पडल्यामुळे कादवा कारखाना, तसेच पिंपळगाव बाजार समिती याकडे जाण्याचा जवळचा मार्ग असल्याने, या मार्गावर रहदारीचे प्रमाण जास्त आहे. या पुलावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. रहदारीचा हा एकमेव मार्ग असल्याने याच पुलावरून नागरिकांना ये-जा करावे लागते. सर्व परिस्थिती संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून दिले असूनही, त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन मोठी दुर्घटना घडण्याआधी या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी हिरामण गणोरे, विजय फुगट, संजय आवारे, मधुकर फुगट, नारायण पालखेडे, भाऊसाहेब गणोरे, ज्ञानेश्वर गणोरे, पुरुषोत्तम गणोरे, सुनील कथोरे, शंकर गणोरे, अमोल गणोरे, पिंटू गणोरे नारायण कळमकर, बाळासाहेब पालखेडे आदी ग्रामस्थांनी केली आहे. (३१ जानोरी)
ब्रिटिशकालीन पूल
कालवा हा ब्रिटिशकालीन असल्याने पहिल्यापासूनच ते उजव्या कालव्याकडे अर्थातच नाशिक पाटबंधारे विभागाकडे वर्ग आहे. नाशिक पाटबंधारे विभागाकडे दिंडोरी तालुक्यातील हा एकमेव कालवा वर्ग असल्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे पूर्णतः दुर्लक्षच असल्याचे दिसून येते. या कालव्यावरील धोकादायक पुलाची कल्पना देऊनही याकडे लक्ष दिले जात नाही, हे विशेष. पुलाची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली आहे.