कादवाची ५ लाख क्विंटल विक्रमी साखर निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:15 IST2021-05-09T04:15:49+5:302021-05-09T04:15:49+5:30
यंदा सातत्याने दर महिन्याला पडणारा पाऊस व मार्चपासून कोरोना प्रादुर्भाव या नैसर्गिक आपत्तीवर मात करत कादवाने विक्रमी गाळप केले ...

कादवाची ५ लाख क्विंटल विक्रमी साखर निर्मिती
यंदा सातत्याने दर महिन्याला पडणारा पाऊस व मार्चपासून कोरोना प्रादुर्भाव या नैसर्गिक आपत्तीवर मात करत कादवाने विक्रमी गाळप केले आहे.
नुकताच हंगाम संपला असून १७७ दिवसांत ४ लाख ४४ हजार १५७ मे. टन उसाचे गाळप होत पाच लाख क्विंटल साखर निर्मिती झाली आहे. सरासरी साखर उतारा ११.२६ राहिला आहे. प्रतिदिन १२५० मे.टन गाळप क्षमता असलेल्या कादवा सहकारी साखर कारखान्याचे टप्प्याटप्प्याने आधुनिकीकरण करण्यात येऊन गाळप क्षमता २५०० मे.टन करण्यात आली. यंदाच्या गाळप हंगामात कोरोनाचे सावट व सातत्याने हवामान बदल होत झालेल्या बेमोसमी पावसाचा मोठा फटका बसला. मार्च मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढल्याने अनेक ऊसतोड मजूर कमी झाल्याने व आहे त्या मजुरांची उन्हामुळे कार्यक्षमता कमी झाल्याने काही दिवस हंगाम लांबला. अनेक अडचणींवर मात करत अखेर १७७ दिवसांत गळीत हंगामाची सांगता झाली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांच्या हस्ते शेवटच्या ऊस मोळीचे पूजन करण्यात आले. यावेळी व्हा. चेअरमन उत्तमबाबा भालेराव, सर्व संचालक कार्यकारी संचालक हेमंत माने, सर्व अधिकारी कामगार उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष उत्तमबाबा भालेराव, संचालक तसेच कार्यकारी संचालक हेमंत माने उपस्थित होते.
केवळ साखर निर्मिती करून कारखाने चालणे शक्य नाही. त्यामुळे इथेनॉल प्रकल्पाचे काम हाती घेतले असून आगामी हंगामापर्यंत प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कादवाची गाळप कार्यक्षमता वाढली असून उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक उसाला भाव दिला जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ऊस लागवड करावी.
- श्रीराम शेटे, अध्यक्ष, कादवा