राष्ट्र सेवादलाचे योगदान मोलाचे
By Admin | Updated: April 19, 2016 00:35 IST2016-04-18T23:19:05+5:302016-04-19T00:35:03+5:30
भाई वैद्य : शेतकरी, शिक्षकांच्या समस्या मार्गी लावण्यात हातभार

राष्ट्र सेवादलाचे योगदान मोलाचे
संगमेश्वर : भारतीय स्वातंत्र्याची चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या आणि अशा अनेक आंदोलनात राष्ट्र सेवादलाच्या सैनिकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. देशातील सध्याचे वातावरण गढूळ होत चालले असल्याने सेवादल सैनिकांनी सक्रीय होण्याचे आवाहन ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी येथे केले.
राष्ट्र सेवादलाचा सध्या अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी या. ना. जाधव विद्यालयाच्या प्रांगणात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाई वैद्य यांनी मार्गदर्शन केले.
विचारांच्या आधारावर कार्यकर्ते तयार करणारी संघटना म्हणून सेवादलाकडे बघितले जाते. सेवादलाच्या माध्यमातून शेतकरी, कामगार, कर्मचारी, शिक्षक आदिंच्या संघटना तयार होऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात मोठा हातभार लागला आहे. अमृत महोत्सवी वर्षात एक कोटी रुपयांचा निधी जमविण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले असून, त्यातून पूर्ण वेळ कार्यकर्ते घडविणे व त्यांचे मानधन तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले आहे. जून महिन्यात सेवादल कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा होणार आहे.
सर्व आव्हान पेलण्याची ताकद सेवादल सैनिकात असून, त्यांनी सक्रीय होण्याचे आवाहन केले.
प्रारंभी सानेगुरूजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना सामूहिकपणे म्हणण्यात आली. सेवादलाच्या ७५ वर्षाचा वाटचालीचा आढावा विलास पवार यांनी घेतला. सेवादलाचे विश्वस्त व माजी शिक्षक आमदार जे. यू. ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार दत्ता वडगे, डॉ. सुगन बरंठ आदिंनी मार्गदर्शन केले. वयाची ८८ पूर्ण करून सक्रीय योगदान दिल्याबद्दल भाई वैद्य यांचा रमेश शर्मा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. गिरणा गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र दिघे व सुभाष परदेशींचा सत्कार भार्इंच्या हस्ते करण्यात आला. मालेगाव शाखेकडून २५ हजार रुपये अमृत महोत्सवी निधीचा धनादेशही सुपूर्द करण्यात आला. कार्यक्रमास अशोक फराटे, ओंकार अप्पा लिंगायत, अॅड. लक्ष्मीकांत बेडेकर, संजय जोशी, सुनील वडगे, विकास मंडळ, अशोक पठाडे, हरीश पाठक, गुफरान अन्सारी, वसंत पूरकर, सुभाष पाटील, सुरेंद्र टिपरे, हरिभाऊ पगारे, रविराज सोनार, भास्कर तिवारी, अॅड. कासलीवाल, सोमनाथ वडगे, डॉ. परवेज अन्सारी, अॅड. भामरे कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन नचिकेत कोळपकर यांनी केले. आभार सेवादलाचे शहर अध्यक्ष जयेश शेलार यांनी मानले. (वार्ताहर)