जोरदार वार्यासह शहरात पावसाच्या सरी
By Admin | Updated: May 7, 2014 21:56 IST2014-05-07T21:18:25+5:302014-05-07T21:56:28+5:30
नाशिक : कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या नाशिककरांना सायंकाळच्या सुमारास अर्धा तास झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला.

जोरदार वार्यासह शहरात पावसाच्या सरी
नाशिक : कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या नाशिककरांना सायंकाळच्या सुमारास अर्धा तास झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला. वाढत्या तपमानामुळे नाशिकरांच्या अंगाची काहिली झालेली असतानाच सायंकाळी दाटून आलेले आभाळ आणि वाहणार्या वार्यामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर मात्र जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह शहरातील अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे शहरातील अनेक भागातील वीजपुरवठादेखील खंडित झाला होता.
आजचा पारा वाढलेला असतानाच सायंकाळच्या सुमारास आभाळ दाटून आल्याने वातावरणात अधिकच उकाडा निर्माण झाला होता. पावसाच्या थेंबांसह जोरदार वाराही वाहू लागल्याने शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. विशेषत: नाशिकरोड परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. वार्यासह कोसळणार्या पावसामुळे या भागातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याचप्रमाणे पंचवटीतील काही भागात काहीकाळ पावसाने हजेरी लावली. सिडको, सातपूर येथेही आभाळ दाटून आले; मात्र या ठिकाणी तुरळक पाऊस झाला. नाशिकरोडसह शहरातील मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे विक्रेत्यांची तारांबळ उडाली, तर बुधवार बाजारातही व्यापार्यांचे चांगलेच हाल झाले.
सायंकाळच्या सुमारास जोरदार वारे वाहू लागल्याने शहरातील बहुतांश भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. यामुळे अगोदरच उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांच्या त्रासात अधिकच भर पडली. काही ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला होता. पाऊस थांबल्यानंतर तेथील वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला.
००००इन्फो----
तीन फिडर्स नादुरुस्त
जोरदार वार्यासह अवघ्या अर्धा ते पाऊण तास पडलेल्या पावसामुळे शहरातील वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला होता. सातपूर येथील ३३ केव्ही फिडरमध्ये बिघाड झाल्याने या फिडरवरील ग्राहकांना सुमारे तासभर वीजपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे सातपूर, महात्मानगर, त्र्यंबकरोड, तसेच गंगापूर परिसरातील काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच ३३ केव्ही पंचक फिडरवरही स्ट्रिपिंग झाल्याने या फिडरवरील ग्राहकही हैराण झाले होते. टाकळी फिडर वाहिनीवर एकूण ११ ठिकाणी स्ट्रिपिंग झाल्यामुळे या वाहिन्यांवरील हजारो ग्राहकांना वीजपुरवठा होऊ शकला नाही. वार्यासह पाऊस सुरू झाल्याने काही ठिकाणी वीज कंपनीनेच वीजपुरवठा तात्पुरता बंद केला होता. काही वेळातच वीजपुरवठा सुरळीत होईल, असा दावा वीज कंपनीच्या अधिकार्यांनी करूनही सुमारे तीन तासांपेक्षा अधिक वेळ अनेक भागातील वीजपुरवठा खंडितच होता.