नववर्ष ‘स्वागत यात्रे’तून जनजागृती अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:38 IST2019-04-01T00:38:07+5:302019-04-01T00:38:55+5:30
गेल्या तीन वर्षांपासून गुढीपाडव्यानिमित्ताने काढण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेच्या माध्यमातून कला, संस्कृतीचे दर्शन घडविले जात असताना यंदा मात्र पाणीबचत आणि मतदान जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे.

नववर्ष ‘स्वागत यात्रे’तून जनजागृती अभियान
नाशिक : गेल्या तीन वर्षांपासून गुढीपाडव्यानिमित्ताने काढण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेच्या माध्यमातून कला, संस्कृतीचे दर्शन घडविले जात असताना यंदा मात्र पाणीबचत आणि मतदान जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे.
अत्रेयनंदन बहुद्देशीय सांस्कृतिक व सामाजिक संस्था कामटवाडे व नववर्ष स्वागत यात्रा समिती यांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत यावर्षी १०० टक्के मतदान, पाणी बचत, एकात्मिकता याबाबत चित्ररथ तयार करून जनजागृतीकरून करण्यात येणार असल्याची माहिती नववर्ष स्वागत समितीच्या अध्यक्ष प्रा. वैशाली शिंदे, कार्याध्यक्ष राजेंद्र फड, कोषाध्यक्ष योगेश मांडे, सचिव राजेश मालपुरे यांनी दिली.
सिडको परिसरात तीन वर्षांपासून गुडीपाडवानिमित्त सर्व समाजाचे संघटन व समाज प्रबोधन तसेच सिडको परिसरात सांस्कृतिक अभिसरण व्हावे या हेतूने नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.
या यात्रेत सामाजिक संस्था, सामाजिक मंडळे, विविध शैक्षणिक संस्था यांचा सहभाग असतो. शोभायात्रेत पारंपरिक ढोलपथक, झांजपथक, ध्वजपथक, लेजीम सहभागी होणार आहे.
शनिवार, दि ६ एप्रिल रोजी सकाळी ६.३० वाजता सिडको परिसरातून वावरेनगर चौक ते माउली लॉन्स व धन्वंतरी कॉलेज ते वावरेनगर चौक ते माउली लॉन्स आणि पवननगर मारुती मंदिर ते माउली लॉन्स या तीन वेगवेगळ्या ठिकाणावरून सुरू होऊन डी.जी.पी. नगर-२ माउली लॉन्सशेजारी ठाणे जनता सहकारी बँकसमोर कामटवाडे येथे सकाळी ८.०० वाजता एकत्र येणार आहे.