अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले शेतकऱ्यांना खतवाटप
By Admin | Updated: September 3, 2014 00:33 IST2014-09-03T00:33:50+5:302014-09-03T00:33:50+5:30
अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले शेतकऱ्यांना खतवाटप

अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले शेतकऱ्यांना खतवाटप
नाशिक : दमदार पाऊस झाल्यानंतर खरिपाच्या पेरण्यांना वेग आला असून, रासायनिक खतांना त्यातही युरिया खताला मागणी वाढली आहे. युरिया खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या येवला तालुक्यातील तीन दुकानांवर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. तसेच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना युरिया खतांच्या गोण्यांचे वाटप करण्यात आले.
लोकमतने यांसदर्भात २८ आॅगस्ट रोजीच ‘युरिया खताचा काळाबाजार जोरात’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून शेतकऱ्यांच्या पिळवणुकीकडे तसेच खतांच्या कृत्रिम टंचाईकडे कृषी विभागाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार कृषी विभागाने छापासत्र सुरू केले असून, आतापर्यंत तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत. युरिया खत असूनही काही विक्रेते शेतकऱ्यांना खते देत नसल्याच्या तक्रारी येवला तालुक्यातून येताच कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधिकारी अभिजित जमदाडे यांनी सहकारी अधिकाऱ्यासह अंदरसूल येथील सद्गुरू कृषी सेवा केंद्र व रघुनंदन कृषी सेवा केंद्र या दुकानांची तपासणी केली. या दुकानातील युरिया खतांची विक्री अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. तसेच कृषी अंकुश अॅग्रो सर्व्हिसेस या कृषी निविष्ठा विक्री केंद्रातही युरियाचा साठा असल्याचे समजताच अभिजित जमदाडे यांनी खत विक्रेत्या दुकानादारास युरिया खतांची विक्री करण्याचे आदेश देऊन सुमारे २०० युरिया खतांच्या गोण्या शेतकऱ्यांना शासकीय दराने विक्री करण्यास भाग पाडले. यापुढेही साठेबाजी करून शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून न देणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कायद्यांतर्गत पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.(प्रतिनिधी)