मालेगावसह परिसर पोळा सणासाठी सज्ज
By Admin | Updated: August 30, 2016 00:33 IST2016-08-29T22:51:37+5:302016-08-30T00:33:28+5:30
संगमेश्वर : शेतकऱ्यांत अपूर्व उत्साह; मातीचा सर्जा-राजा बाजारात

मालेगावसह परिसर पोळा सणासाठी सज्ज
संगमेश्वर : शेतकऱ्यांचे गाव म्हणून संगमेश्वर प्रसिद्ध आहे. मनमाड चौफुली, चंदनपुरी शिवार, द्याने, वडगाव आत्ताच्या कलेक्टरपट्टा भाग परिसरात या भागातील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर बागायती व कोरडवाहू शेती होती. संगमेश्वरातील आत्ताचा सावतानगर, ज्योतीनगर, देवरे प्लॉट, काट्या मारुती, मोतीबाग नाका, मंडाळे बाग हा नागरी वस्तीच्या भागातही शेती होती. पाटपाण्यावर पिके घेतली जात होती.
प्रत्येकाच्या शेतात बैलजोडी होती. या बैलांद्वारे शेतीची कामे करून घेतली जात होती. बैलपोळ्याचा सणही जोरदारपणे साजरा केला जायचा. शहरात राहूनही ग्रामसंस्कृती जपली जात होती. बैलांच्या अंगावर रंगीत झुली पांघरून त्यांना सजवून सायंकाळी वाजत-गाजत मिरवणूक निघायची. गावाच्या मारुती मंदिराला फेरी मारून नारळ वाहिली जायचे. मिरवणुका बघण्यासाठी आबालवृद्ध नागरिक महादेव मंदिर, मारुती मंदिर, सावता चौक, जुना होळी चौक, पाटीलवाडा, जगताप गल्लीत गर्दी करायचे, गुलालाची उधळण करीत कोणाची बैलजोडी आदि याची जणू काही स्पर्धाच असायची. गृहिणी दारात आलेल्या सर्जा-राज्याला ओवाळून पुरणपोळीचा नैवेद्य प्रेमपूर्वक खाऊ घालायच्या. घुंगरांच्या आवाजाने सर्व परिसर दुमदुमून जायचा. शेतगडी व शेतकरी मंडळी मांडीला मांडी लावत पुरणपोळीच्या मेजवानीवर ताव मारायचे. ज्यांच्याकडे बैलजोडी नसायची त्यांचे अंगणात जाऊन मग त्या घरातील गृहिणी सर्जा-राजाला ओवाळून पुरणपोळीचा घास भरवायच्या.
काळ बदलला. शहराचे विस्तारीकरण झाले आणि सीमेंटची नगरे उभी राहिली. पूर्वीसारखा पाऊस पडेनासा झाला. शेती करणे जिकिरीचे झाले. शेतकामाला मजूर मिळेनात. अनेकांच्या जमीन बिनशेती झाली आणि नागरी वस्त्या उभ्या राहिल्या. यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टरद्वारे शेती करणे सोपे झाले. त्यामुळे अनेकांना बैलजोडी ठेवणे परवडेना. बैलांऐवजी ट्रॅक्टर दारात दिसू लागले आणि सणावर त्यांचा परिणाम झाला आहे. पूर्वीसारखी बैलपोळ्याची रंगत कमी होऊ लागली. ती आजही दिवसेंदिवस कमी होत गेली आहे. आता फक्त जुन्या आठवणीच शिल्लक राहिल्यात. जिवंत बैलांऐवजी मातीच्या बैलांची पूजा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.(वार्ताहर)