मनसेच्या नगरसेवकांचा पंचनामा
By Admin | Updated: June 4, 2014 00:44 IST2014-06-04T00:44:07+5:302014-06-04T00:44:28+5:30
मनसेच्या नगरसेवकांचा पंचनामा

मनसेच्या नगरसेवकांचा पंचनामा
नाशिक : गेल्या दोन वर्षांत नगरसेवकाने कोणती कामे केली, नगरसेवक भेटतो की नाही, असे थेट प्रश्न नागरिकांनाच विचारून मनसेचे संपर्क अध्यक्ष अविनाश अभ्यंकर आॅडिट करीत आहेत. आजपासून या आॅडिट दौर्याला सुरुवात झाली असून, नगरसेवकांच्या बर्या-वाईट कामगिरीची ते नोंद घेत असल्याने नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. महापालिकेत दोन वर्षे सत्ता असूनही लोकसभा निवडणुकीत मनसेच्या विरोधात नकारात्मक मतदान झाले. नाशिकच नव्हे, तर अन्य मतदारसंघांतदेखील महापालिकेतील मनसेची नकारात्मक कामगिरी हाच कळीचा मुद्दा होता. लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर मनसे खडबडून जागी झाली असून, विधानसभेत या पराभवाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राज ठाकरे यांनी खास संपर्क अध्यक्ष म्हणून अविनाश अभ्यंकर यांच्यावर जबाबदारी दिली आहे. सोमवारी पालिका अधिकार्यांची बैठक घेणार्या अभ्यंकर यांनी आज सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक १८ व २० तसेच १९ आणि ३८ मधील नगरसेवकांबरोबर प्रभागनिहाय कामांची पाहणी केली. नगरसेवकांनी केलेली कामे बघतानाच जेथे कामे झालेली नाहीत त्यातील अडचणी काय हे जाणून घेतले आणि प्रशासकीय अडसर असलेल्या बाबींची यादी केली. इतकेच नव्हे तर थेट नागरिकांना भेटून नगरसेवकाने कोणती कामे केली, कामावर समाधानी आहात का, नगरसेवक भेटतो किंवा नाही, असे प्रश्न विचारल्याने मनसेच्या नगरसेवकांची झोप उडाली आहे. काही नगरसेवकांनी अशा प्रकारच्या पंचनाम्यामधून सकारात्मकता दर्शविली; मात्र काही नगरसेवकांनी हा आपल्याच पक्षातील नगरसेवकांवर अविश्वास नाही काय, असाही प्रश्न केला.