कांद्यानेही नाही दिली साथ; बळीराजाचा डोक्याला हात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 00:08 IST2020-05-25T21:13:54+5:302020-05-26T00:08:10+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील बळीराजांच्या समोरील समस्या कायम असून शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा पिकास हमीभाव मिळत नसल्याने व उत्पादन खर्चही सुटत नसल्याने कांदा उत्पादकांसमोर उदरनिर्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कांद्यानेही नाही दिली साथ; बळीराजाचा डोक्याला हात!
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील बळीराजांच्या समोरील समस्या कायम असून शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा पिकास हमीभाव मिळत नसल्याने व उत्पादन खर्चही सुटत नसल्याने कांदा उत्पादकांसमोर उदरनिर्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे शासनाने तत्काळ उपाययोजना करुन शेतकरी वर्गाला दिलासा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कोरोनाच्या साथीच्या सर्वत्र थैमान घातल्याने शेतकर्यांनाही त्याचा फटका बसत आहे. द्राक्षे, टमाटा, कोथिंबीर तसेच अन्य फळे व भाजीपाल्यास भाव मिळत नसल्याने काय पिकवावे असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. त्यातच मोठ्या कष्टाने कांदा पिकविला. कर्ज घेऊन कांदा पीक घेतले. कांदा पिकाला आता चांगला भाव मिळेल व कोरोनामध्ये आपला वाया गेलेला खर्च भरून निघले या आशेवर बळीराजा होता.परंतु जेव्हा शेतकरी वर्गाने आपला कांदा बाजारपेठेत आणला तेव्हा मात्र एक हजारांच्या आतच भाव मिळाल्याने अपेक्षांवर पाणी फेरले गेले. शेतकरी आपल्या शेतात जो शेती माल पिकवितो तो काही तरी आशा घेऊनच. पंरतु काही निवडक काळ जर सोडला तर बळीराजांची एकही मनात निर्माण केलेली आशा पूर्ण झालेली नाही. प्रत्येक पिकविलेल्या पिकांला योग्य भाव न मिळाल्याने व कांदा पिकांला भाव न मिळाल्याने शेतकरी हतबल होऊन खरीप हंगाम तोंडावर आल्याने भांडवल कसे उभे करायचे या चिंतेत सापडला आहे. मदतीला कोण देवदूत धावून येणार याकडे शेतकरी वर्गाच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
------------------
दिवसेंदिवस त्यांचे व्याज वाढतचं आहे. आता हे घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवेचनेत बळीराजा सापडला आहे. दिवसेंदिवस शेतकरी वर्ग समास्याच्या विळख्यात सापडला जात असून आता आपला संसार कसा चालवावा व पोट कसे भरायचे असा सवाल निर्माण झाला आहे.