महापालिकेला नालेसफाईचा पडला विसर
By Admin | Updated: May 29, 2014 00:47 IST2014-05-29T00:45:38+5:302014-05-29T00:47:54+5:30
दुर्लक्ष : प्रशासनाची दिरंगाई; निधी पडून

महापालिकेला नालेसफाईचा पडला विसर
दुर्लक्ष : प्रशासनाची दिरंगाई; निधी पडून
नाशिक : महापालिकेच्या वतीने दरवर्षी मे महिन्यात मान्सूनपूर्व नाल्यांची दुरुस्ती आणि सफाई मोहीम राबविली जाते. परंतु यंदा मे महिना उलटण्यास आला तरीही महापालिकेकडून मोहीम हाती घेण्यात आली नसल्याने प्रशासनाला या कामाचा विसर पडल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या कामासाठी महापालिकेकडे स्वतंत्र निधी असतानाही प्रत्यक्ष कामास टाळाटाळ केली जात असल्याने प्रशासनाच्या भूमिकेविषयी लोकप्रतिनिधींनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
महापालिकेच्या वतीने दरवर्षी मान्सूनपूर्व कामे केली जातात. तुंबलेले नाले साफ करून नाले तुंबणार नाहीत यासाठी त्यांची दुरुस्तीदेखील केली जाते. जे नैसर्गिक नाले आहेत ते नाले पूर्ववत करण्यासाठी संबंधिताना सूचना देण्याबरोबरच असे नाले खुले केले जातात. यासाठी महापालिकेने स्वतंत्र दोन कोटींच्या निधीची तरतूद केलेली आहे. मात्र नालेसफाईचा कोणताही कार्यक्रम यंदा हातीच घेतला नसल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे. केवळ प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे यंदा पालिकेला नालेसफाईचा विसर पडल्याचे दिसून येते.
पावसाळी गटारींंची दुरुस्ती करणे, तसेच चेंबरचे बंद झालेले झाकण मोकळे करणे ही कामे मान्सूनपूर्व कामे केली जातात. माती आणि दगडामुळे बंद झालेले नैसर्गिक नाले, तसेन मनपाचे नाले साफ करून पाणी जाण्यास मार्ग मोकळा करून देण्यासाठी ही कामे हाती घेतली जातात. मात्र यंदा असे कोणतेही काम झाले नसल्याने पावसात शहरात अनेक ठिकाणी पाणी तंुबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इतकी घाई नको
पावसाला अद्याप विलंब असल्याने इतक्यात नाले सफाईचे काम करणे शक्य नसल्याचा निष्कर्ष काढत ड्रेनेज विभागाने बचाव केला आहे. पाणी तुंबल्याशिवाय कोठे काय परिस्थिती आणि कोणती उपाययोजना करावी लागेल, याचा अंदाज आताच बांधणे घाईचे ठरेल, असे या विभागाचे म्हणणे आहे. शहरात ज्या ठिकाणी पाणी तुंबते असे नियमित स्पॉय आहेत, तेथे मात्र कामे करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.