नायगावसह नऊ गाव पाणीपुरवठा योजना पूर्ववत
By Admin | Updated: June 27, 2016 00:28 IST2016-06-26T22:11:34+5:302016-06-27T00:28:33+5:30
नायगावसह नऊ गाव पाणीपुरवठा योजना पूर्ववत

नायगावसह नऊ गाव पाणीपुरवठा योजना पूर्ववत
नायगाव : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे आठवडाभरापासून बंद असलेली नायगावसह नऊ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सोमवारपासून पूर्ववत झाली आहे. गुरुवार व रविवार हे दोन दिवस योजनेत सहभागी गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
जलसंपदा विभागाच्या शिफारशीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशामुळे नायगावसह नऊ गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेला आठवडाभरापूर्वी सील लावण्यात आले होते. ऐन पाणीटंचाईच्या काळातच योजना बंद करण्यात आल्याने नायगाव खोऱ्यात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याचे चित्र आहे. अचानक योजना बंद होण्याच्या प्रकारामुळे याबाबत उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
चेहडी येथे दारणा नदीपात्रातून उचललेले पाणी मोहदरीतील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तेथून मोह, मोहदरी, वडझिरे, जायगाव व देशवंडी या योजनेतील गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. नायगाव खोऱ्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी नवसंजीवनी ठरलेल्या या योजनेकडे जीवन प्राधिकरणसह समिती पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वर्षभरापासून योजना डळमळीत झाली आहे. पाणीपुरवठ्याबाबत अनियमितता दिसून येत असल्याने योजनेच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाणीटंचाईच्या काळातच योजना संकटात सापडल्यामुळे नागरिक धास्तावले आहेत.
सोमवारपासून योजना पूर्ववत झाली असून, गुरुवार व रविवार हे दोन दिवस योजनेत सहभागी गावांना पाणीपुरवठा केला जाणार असल्यामुळे परिसरातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.
धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने योजना
अडचणीत आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन संबंधित विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर)