राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेतून ३०, ५० मीटर होणार बंद

By Admin | Updated: May 23, 2014 01:06 IST2014-05-23T00:41:14+5:302014-05-23T01:06:48+5:30

अखेरची स्पर्धा : ऑलिम्पिकच्या नियमानुसार होणार स्पर्धा

The National Archery Championship will close 30-50 meters | राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेतून ३०, ५० मीटर होणार बंद

राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेतून ३०, ५० मीटर होणार बंद

अखेरची स्पर्धा : ऑलिम्पिकच्या नियमानुसार होणार स्पर्धा
नरेश हाळणोर / नाशिक : आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार्‍या धनुर्विद्या स्पर्धेमध्ये रिकर्व्ह (फिटा) या प्रकारालाच जशी मान्यता आहे त्याचप्रमाणे केवळ ७० मीटर अंतराच्याच दोन फेर्‍या होतात. आता याच धर्तीवर भारतातीलही स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धांमध्ये होणार्‍या ३०, ५० आणि ६० मीटर अंतराच्या स्पर्धा बंद होणार आहेत तर खेळाडूंना प्रोत्साहन आणि सराव व्हावा यासाठी इंडियन राऊंडमधून ५० मीटर अंतराची स्पर्धा मात्र सुरूच राहणार आहे. जुन्या नियमांनुसारची नाशकात होणारी शालेय राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा अखेरची असणार असून, यापुढील स्पर्धा या ऑलिम्पिकच्या नियमांनुसारच होणार आहे.
भारतामध्ये अजूनही अनेक स्पर्धा या आंतरराष्ट्रीय नियमानुसार होत नाहीत. याबाबत अनेकदा वादही झाले आहेत. काही वर्षांपूर्वी कुस्तीच्या बाबतीतही असे झाले होते. मातीच्या कुस्तीमध्ये खेळण्याचा पहिलवानांना सराव असल्याने त्यांना मॅटवर खेळणे कठीण जात होते. मात्र आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स फेडरेशन व ऑलिम्पिक संघाने मॅटचे बंधन घातल्यानंतर अनेक वर्षे भारताने त्यास विरोध दर्शविण्याचा प्रयत्न केला. अखेर तेच नियम मान्य केल्यानंतर गेल्या काही स्पर्धांमधून भारताला कुस्तीमध्ये पदकेही मिळत आहेत.
नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेपासून क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांचीही प्रसिद्धी झाली. त्यात धनुर्विद्या स्पर्धेचाही समावेश होता. मात्र भारतामध्ये आजतागायत ऑलिम्पिक वा आंतरराष्ट्रीय नियमांनुसार ही स्पर्धा होत नव्हती. आंतरराष्ट्रीय पातळीवर रिकर्व्ह (फिटा) हा प्रकार वापर करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे फक्त ७० मीटर अंतराच्याच दोन फेर्‍यातून २४ राऊंड होतात.
भारतामध्ये राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमधून फिटा प्रकारात ३० मीटर, ५० मीटर आणि ७० मीटर अंतराच्या फेर्‍या होतात. मात्र या वर्षापासून ऑलिम्पिकच्या नियमानुसारच राष्ट्रीय स्पर्धांमधूनदेखील केवळ ७० मीटर अंतराच्या १२ राऊंडच्या दोन फेर्‍या घेतल्या जाणार आहेत. २४ राऊंडमधून मिळालेल्या गुणांतून खेळाडूंची पदके ठरतील. त्यामुळे नाशिकमध्ये सुरू असलेली शालेय राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा ही जुन्या नियमांनुसार होणारी अखेरची स्पर्धा ठरणार आहे.

इंडियन राऊंडमधून ३० मीटर बंद
दरम्यान, रिकर्व्ह (फिटा) या प्रकारामधून जशा फक्त ७० मीटरच्याच स्पर्धा होतील त्याचप्रमाणे इंडियन राऊंडमधूनही केवळ ५० मीटरच्याच स्पर्धा होतील. या गटातील ३० मीटरची स्पर्धा यानंतरच्या स्पर्धांमधून होणार नाहीत. त्यामुळे भारतीय खेळाडूंना ५० मीटरमध्ये २४ राऊंड खेळावे लागतील.

Web Title: The National Archery Championship will close 30-50 meters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.