नाशिक : महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर एकीकडे विजयी उमेदवार गुलाल उधळत असताना, दुसरीकडे मात्र पराभूतांमध्ये वादाचे फटाके फुटत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पक्षनेत्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.
शिंदेसेनेतील काही पराभूतांनी सोमवारी (दि. १९) सकाळी पक्ष कार्यालयात जमण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, भाजपतील २० जागा अंतर्गत घोळामुळे पडल्याचा एक अहवाल नाशिक कार्यालयातून पाठवण्यात आला आहे, तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांच्या घोळाबाबतही एक अहवाल पक्षनेत्यांना पाठवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
नाशिक महापालिकीची निवडणूक नुकतीच पार पडली. अनेक ठिकाणी त्याचे पडसाद उमटले असून, पराभूतांकडून विजेत्यांना टार्गेट केले जात आहे. मात्र, दुसरीकडे जवळपास सर्वच पक्षांत नाराजीचे फटाके फुटत आहेत. भाजपचे पंचवटीतील पराभूत उमेदवार सचिन ढिकले यांनी सोशल मीडियावर पक्षाच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक पाडल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे पक्षाच्या ४४ जागांचा पराभव झाला असून, त्याचा एक अहवाल तयार करून पाठवण्यात आला आहे. त्यात २० जागा या चुकीच्या पद्धतीने वाटप आणि अन्य कारणांमुळे पडल्याचा दावा करण्यात आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
शुक्रवारी (दि.१६) निकालाच्या दिवशी शिंदेसेनेचा आलेख घसरताना बघून पक्षाचे नेते आणि शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना भाजपबरोबर महायुती न करण्याचा आग्रह धरणाऱ्या संबंधित नेत्यांना धारेवर धरल्याचे समजते. पक्षातील काही नेत्यांनी भाजपबरोबर युती नसली, तरी ४५ ते ५० जागा निवडून येण्याचा दावा केला होता. त्यामुळे दादा भुसेही राजी झाले. दरम्यान, जागा वाटप करताना प्रचंड गोंधळ झाला.
शिवसेना फुटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच नाशिकमध्ये आल्यावर त्यांचे स्वागत करणाऱ्या दिगंबर नाडे या युवकालाही उमेदवारी देण्यात आली नाही. युवक सेनेला कोणत्याही प्रकारे उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी प्रचारातून अंग काढून घेतले होते. युवा सेनेचे अध्यक्ष पूर्वेश सरदेसाई यांनी काही प्रमाणात युवकांना सक्रिय केले असले तरी पक्षाला अपेक्षित यश आले नाही. अर्थात, पराभवानंतर आपसातच वादविवाद सुरू झाले असून, पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा पराभव झाल्याने त्याने पक्षातील काही नेत्यांना जबाबदार धरले असून, सोमवारी (दि.१९) पक्ष कार्यालयात जमण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केला आहे.
भाजपला यश मिळाले असले तरी ४४ जागा पराभूत झाल्या आहेत. त्याचा विचार करून त्यासंदर्भातील अहवाल पक्षनेत्यांना पाठवण्यात आला आहे. पक्षाचे काही पराभूत उमेदवार सोशल मीडियावर भाष्य करीत असले, तरी नैराश्येतून असे प्रकार घडत आहेत.
-सुनील केदार, शहराध्यक्ष, भाजप
राष्ट्रवादीत नवीन अध्यक्षांचा शोध
राष्ट्रवादीचे (शरद पवार) शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी मतदान संपताच राजीनामा देऊन पक्षाच्या नेत्यांवर आरोप केले. त्यामुळे आता या पक्षाकडून नवीन शहराध्यक्षाचा शोध घेतला जात आहे.
एबी फॉर्म घोटाळ्याप्रकरणी दोन जणांची चौकशी समिती
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे एबी फॉर्म परस्पर एका नेत्याला देण्यात आणि त्यामुळे सिडकोत उमेदवार घोषित झालेली नसतानाही काही अर्ज भरण्यात आले. त्यामुळे अधिकृत उमेदवारांना माधार घेण्याची सूचना लागली किवा पुरस्कृत करावे लागले. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती नियुक्त केली आहे.
काँग्रेस पक्षाच्या गोंधळाचा अहवाल पाठवणार
काँग्रेस पक्षाच्या वतीने २१ जागा लढवण्यात येणार होत्या. मात्र, तेथेही उमेदवारीसाठी एबी फॉर्म देण्याचा घोळ घालण्यात आला.उद्धवसेनेकडून जे इच्छुक होते, त्यांना बळजबरी अर्ज देण्यात आल्याने त्यांनी चक्क अर्ज फाडले.पंचवटीत पक्षाच्याच उमेदवाराला 5 बळजबरी माघार घेण्यास सांगण्यात आले. असे अनेक प्रकार घडले असून, त्याचा अहवालदेखील पाठवण्यात येणार आहे.