चिखलातून करावे लागते मार्गक्रमण
By Admin | Updated: August 7, 2014 02:01 IST2014-08-07T02:01:05+5:302014-08-07T02:01:52+5:30
चिखलातून करावे लागते मार्गक्रमण

चिखलातून करावे लागते मार्गक्रमण
नाशिक : शहरात साडेचारशे कोटी रुपयांची रस्त्यांची सुरू असलेली कामे आणि दुसरीकडे स्थायी समिती सभापतींनी खड्डेमुक्त नाशिकची केलेली घोषणा अशा पार्श्वभूमीवर बोधलेनगरच्या पाठीमागील बाजूस मात्र नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून रस्ताच नाही. उलट पावसाळ्यात चिखल होत असल्याने त्यातून मार्गक्रमण करण्यासाठी सर्कस करावी लागत आहे.
बोधलेनगर परिसराचा मागील भाग गेल्या काही वर्षांत झपाट्याने विकसित झाला आहे; परंतु त्या प्रमाणात रस्त्यासारखीही सुविधा दिली जात नाही. येथील रो-हाऊसच्या परिसरात तीन वर्षांपूर्वी कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र अजूनही या भागात पक्के रस्ते बांधण्यात आलेले नाहीत. परिणामी दर पावसाळ्यात नागरिकांना चिखल तुडवत प्रवास करावा लागतो. चिखलामुळे या भागात कोणीही रिक्षाचालक येण्यास तयार नसतो. त्यामुळे शाळा-कॉलेजमध्ये मुलांना तसाच प्रवास करावा लागतो. अनेकदा वृद्ध आणि मुलांचे पाय घसरून दुखापत झाली आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी प्रभाग ३१ मधील दोन्ही नगरसेवकांना निवेदने दिली आहेत, तसेच पालिकेतदेखील तक्रारी केल्या आहेत. परंतु आजवर कोणीही दखल घेतली नसून आता नागरिकच आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. खड्डे बुजवण्यासाठी दौरा करणाऱ्या पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी किमान या भागात आधी रस्ता करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)