‘स्पोर्ट्स हब’च्या दिशेने वाटचाल...
By Admin | Updated: December 25, 2016 02:11 IST2016-12-25T02:10:58+5:302016-12-25T02:11:13+5:30
‘स्पोर्ट्स हब’च्या दिशेने वाटचाल...

‘स्पोर्ट्स हब’च्या दिशेने वाटचाल...
किरण अग्रवाल : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापण्यापूर्वीच नाशकात देशी-विदेशी खेळांचे उत्सव पार पडत असल्याने एकूणच क्रीडा चळवळीला पोषक वातावरण निर्माण होऊन गेले आहे. सर्वच क्रीडा प्रकारांच्या आयोजनाला विविध संस्था व उद्योग समूहांचे आर्थिक पाठबळही लाभत असून, त्यातील लोकसहभागही लक्षणीय ठरत आहे त्यामुळेच नाशिक ‘स्पोर्ट्स हब’ म्हणूनही नावारूपास येण्याची चिन्हे आहेत.वेगाने विकसित होणाऱ्या व काळाबरोबर धावणाऱ्या नाशकात क्रीडा संस्कृती जोमाने मूळ धरत असून, विविध संस्थांचा त्यासाठी हातभार लागत असल्याची बाब निश्चितच कौतुकास्पद म्हणायला हवी. विशेषत: या वर्षअखेरीस गुलाबी थंडीच्या काळात क्रिकेट, कबड्डी, मॅरेथानसारख्या विविध क्रीडा प्रकारांची मोठ-मोठाली आयोजने घडून आल्याने व त्यांना क्रीडारसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही लाभल्याने क्रीडा चळवळीला ‘बुस्टर’ मिळाला असून, नाशिकची वाटचाल आता ‘स्पोर्ट्स हब’कडे सुरू झाल्याचेही त्यातून अधोरेखित झाले आहे.
प्रत्येक शहराची स्वत:ची म्हणून एक ओळख असते. दिवसेंदिवस त्यात नवनवीनतेची भर पडते आणि परिणामत: ओळखीतही स्थित्यंतरे घडून येतात. नाशिकचेही तसेच होते आहे म्हणायचे. मंत्र-तंत्राची पारंपरिक ओळख जपतानाच येथे अनेक प्रवाह रुजले. त्यातून पुण्यापाठोपाठ सांस्कृतिक उपराजधानी म्हणून नाशिककडे पाहिले गेले. तद्नंतर एकापाठोपाठ एक अशा अनेक नामवंत शैक्षणिक संस्थांनी नाशकात येऊन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व मानांकनाच्या शाळा सुरू केल्याने ‘एज्युकेशनल हब’ म्हणून नाशिकची गणना सुरू झाली. महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नाशिककरांनी ‘मनसे’ला सत्तेसाठी सोयीचा ठरणारा कौल दिल्यानंतर नाशिकचे नवनिर्माण करताना राज ठाकरे यांनी या शहराला ‘गार्डन सिटी’ बनविण्याची घोषणा केली. कारण येथे अन्य शहरांपेक्षा कितीतरी पटीने अधिक उद्याने आहेत. या पाठोपाठ चवीने खाणाऱ्या खवय्यांसाठी मिसळची इतकी चलती सुरू झाली की, ‘मिसळ हब’ म्हणून नाशिकची चर्चा सोशल मीडियात घडून येऊ लागली. थोडक्यात या शहराने काळाच्या ओघात जे-जे लाभले ते-ते स्वीकारले व जोपासले. गरजेनुसार बदलाची ही मानसिकताच नाशिकला प्रगतिपथावर नेण्यास कारणीभूत ठरत असून, त्याच मालिकेत येथे रुजू पाहणाऱ्या क्रीडा संस्कृतीचा विचार करता येणारा आहे. अर्थातच, तसा तो करण्यासाठी निमित्त मात्र लाभून गेले आहे ते याच महिन्यात पार पडलेल्या विविध क्रीडा उत्सवांचे. रणजी क्रिकेटपाठोपाठ ‘लोकमत’ एनपीएल क्रिकेट महासंग्राम एकीकडे रंगला असतानाच स्व. गोपीनाथ मुंडे स्मरणार्थ क्रांतिवीर वसंतराव नाईक शैक्षणिक संस्थेतर्फे प्रो-कबड्डी लीग घेण्यात आली. जिल्हा प्रशासनानेही क्रीडा चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘लोकमत’च्या सहकार्यातून ‘स्पोर्ट्स अॅण्ड अॅडव्हेन्चर फेस्टिव्हल’अंतर्गत विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले. आणखीही काही आयोजने येत्या काही दिवसांत होऊ घातली आहेत. त्यामुळे त्यात सहभागी होणाऱ्यांबरोबरच क्रीडारसिकांना ‘अच्छे दिन’ची अनुभूती लाभणे स्वाभाविक ठरावे.
विशेष म्हणजे सर्वाधिक पसंती लाभणाऱ्या क्रिकेटच्या खेळातील रणजी सामन्यांचे आयोजन यशस्वी करण्यात नाशिकने लौकिक स्थापित केला आहे. आणि म्हणूनच येथे बडोदा विरुद्ध उत्तर प्रदेशचा रणजी सामना नुकताच खेळविला गेला. त्यात सुरेश रैना, इरफान पठाण व प्रवीण कुमारसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी नाशिककरांना मिळाली. यासाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा व त्यांचे सहकारी समीर रकटेंसह ‘टीम’ने घेतलेले परिश्रम दाद देण्यासारखेच आहेत. कारण राजधानीची शहरे वगळता नाशिकसारख्या तुलनेने छोट्या ठिकाणी रणजी सामने मिळवणे तसे अशक्यातलेच होते. पण शहा यांनी ते करून दाखविले. त्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मानांकनानुसार क्रीडांगण तयार करण्यापासून तर अन्य सोयी-सुविधांच्या उपलब्धतेपर्यंतच्या साऱ्या बाबी घडवून आणल्या. त्यामुळेच येथे नऊ रणजी सामने होऊ शकले. क्रिकेटच्या या पसंतीला अधिक उंचावर नेण्याचे काम ‘लोकमत’ने केले. ‘आयपीएल’च्या धर्तीवर ‘लोकमत एनपीएल’चे आयोजन करून नाशिकच्या क्रिकेटला दिमाखदारपणा प्राप्त करून देतानाच समृद्धही केले. या आयोजनाच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना पुढे येण्याची व त्यांचे नैपुण्य सिद्ध करण्याची संधी मिळाली. शहरातील उद्योजक व मान्यवरांच्या सहभागातून आकारास आलेले संघ, अतिशय देखणे संयोजन व खेळाडूंसाठी बक्षिसांची लयलूट यामुळे ‘लोकमत’च्या या महासंग्रामाचे अधिकारी, लोकप्रतिनिधींनी तर भरभरून कौतुक केलेच; पण क्रिकेट रसिकांचाही त्यास जोरदार प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळेच यंदा सलग सहाव्या वर्षी क्रिकेटचा हा महासंग्राम रंगला आहे. याहीखेरीज रासबिहारी क्रिकेट चषकासह विविध संस्था-संघटनांतर्फे क्रिकेट सामने नेहमी होत असल्याने या खेळाला चालना मिळत असते. आजवर येथील २५ ते ३० खेळाडूंनी ‘रणजी’पर्यंत मजल मारल्याचे पाहता नाशिककरांचे क्रिकेटमधील स्वारस्य चटकन लक्षात येणारे आहे.
क्रिकेटप्रमाणेच मॅरेथानलाही नाशिककरांचा नेहमी मोठा प्रतिसाद लाभत असतो. जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे आगामी काळात मॅरेथान होऊ घातली असून, त्याची तयारी जोरात सुरू आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून नावारूपास आलेल्या या ‘मविप्र मॅरेथान’मध्येही आबालवृद्धांचा सहभाग असतो. यानिमित्ताने पी.टी. उषा, धनराज पिल्ले, सुशीलकुमार, व्ही.व्ही.एस.लक्ष्मण, मिल्खा सिंगसारख्या खेळाडूंशी नाशिककरांना संवाद साधता आला. याखेरीज प्रतिवर्षी होणाऱ्या ‘नाशिक रन’च्या उपक्रमातही समाजातील सर्व घटक सहभागी होत असतात. वंचिताना मदत व अपंगांना आधार देण्यासाठी सामाजिक बांधीलकीच्या भावनेने विविध उद्योगसमूह एकत्र येऊन ही ‘रन’ आयोजित करत असतात. नाशिकरोडच्या दुर्गादेवी ट्रस्टतर्फे दरवर्षी मॅरेथानचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे, नाशिकची धावपटू कविता राऊतने आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांत चमकदार कामगिरी करून जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. कविता ‘रिओ आॅलिम्पिक’पर्यंत पोहोचलीच, शिवाय मोनिका आथरे, अंजना ठमके, संजीवनी जाधव, किसन तडवी यासारख्या आदिवासी भागातून आलेल्या धावपटूंनी चेन्नई, कोलकाता, वसई आदि ठिकाणच्या मॅरेथानमध्ये बक्षिसे पटकावून नाशिकची कीर्तिपताका फडकत ठेवली आहे. आज देशात कुठलीही ‘मॅरेथान’ असो, तेथे नाशिकची नाममुद्रा उमटल्याखेरीज राहात नाही. ‘मॅरेथॉन’मधील नाशिककरांचा उत्साहवर्धक सहभाग पाहूनच येत्या फेब्रुवारीमध्ये पोलीस प्रशासनाकडूनही ‘मॅरेथान’चे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय वेस्टर्न इंडिया स्पोटर््स असोसिएशन अर्थात ‘विसा’तर्फे सुमारे १५ वर्षांपासून इंडियन नॅशनल चॅम्पियन रॅली आयोजित केली जात असल्याने नाशिककरांना कार व मोटार बाईकचा थरार अनुभवण्यास मिळत असतो. सायकल चळवळीनेही अलीकडच्या काळात मोठा जोर धरला असून, डॉ. महेंद्र व हितेंद्र महाजन बंधूंनी अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय ‘रॅम’ स्पर्धेत सहभागी होत नाशिकचे नाव उंचावले आहे. पोलीस अधिकारी हरिष बैजल, बांधकाम व्यावसायिक किरण चव्हाण आदि मंडळी नेटाने सायकल चळवळ रुजविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
क्रांतिवीर वसंतराव नाईक शैक्षणिक संस्थेतर्फे यंदाच्या वर्षापासून नाशकात प्रो-कबड्डी लीग नावाची भव्यदिव्य स्पर्धाही सुरू करण्यात आली आहे. याच महिन्यात तीचा प्रारंभ झाला. देशी खेळाला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने या लीगची सुरुवात करण्यात आली असून, त्यासही नाशिककरांचा चांगला प्रतिसाद लाभला. आयपीएलच्या धर्तीवर झगमगाटी वातावरणात या स्पर्धा झाल्या. मातीऐवजी ‘मॅट’वर खेळवल्या गेलेल्या या कबड्डी स्पर्धांचे सामने प्रकाशझोतात रंगले व त्यासाठी सुमारे १० लाखांची बक्षिसे दिली गेली. विशेष म्हणजे ‘महाराष्ट्र केसरी’ची अलीकडेच हॅट्ट्रिक साधलेल्या विजय चौधरीसारख्या नामवंत मल्लाने या लीगला आवर्जून उपस्थित राहून आयोजकांचे कौतुक केले. देशी खेळ प्रकारातील कबड्डी व कुस्तीसाठी यापूर्वी महापालिकेतर्फे महापौर चषक स्पर्धाही घेण्यात आल्या होत्या. याखेरीज विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच नाशिक जिल्ह्यातील डोंगरदऱ्यांची पर्यटकांना माहिती करून देतानाच साहसी खेळांना व त्यातील इच्छुकांना संधी मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत यंदाच्या वर्षापासून ‘स्पोर्ट्स अॅण्ड अॅडव्हेन्चर फेस्टिव्हल’चीही सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांसारखे सर्वोच्च अधिकारी एकत्र येऊन या उपक्रमासाठी पुढाकार घेताना दिसले ही खूप मोठी बाब म्हणायला हवी. ‘लोकमत’च्याच सहकार्याने होत असलेल्या या उपक्रमातही शहरातील विविध उद्योजक तथा आस्थापनांनी सहभाग नोंदवत क्रीडा चळवळीच्या विकासात आपला वाटा उचलला आहे. या फेस्टिव्हलअंतर्गत मॅरेथॉन, सायकलिंग, ट्रेकिंग आदिंसह गोदावरी जलदिंडीचा अभिनव उपक्रम होत आहे. या व्यतिरिक्त तलवारबाजी, खो-खो, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, बॅटमिंटन, शरीरसौष्ठव, जलतरण आदिंच्या स्पर्धाही नित्यनेमाने होत असतात. त्यातही दिवसेंदिवस वाढ होत असून, नाशिकचे अनेक खेळाडू राज्य व देशपातळीवर चमकत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी काळात नाशिककडे ‘स्पोर्ट्स हब’ म्हणून पाहिले जाणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.