महावितरणच्या धोरणाविरोधात मनसे आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 16:41 IST2021-07-02T16:41:17+5:302021-07-02T16:41:28+5:30
सिन्नर : वादळवाऱ्याने पडलेले विजेचे खांब उभे करण्यासाठी शेतकरी, घरगुती ग्राहकांना पैसे मोजावे लागत असल्याने त्यांची पिळवणूक थांबविण्याची मागणी ...

महावितरणच्या धोरणाविरोधात मनसे आक्रमक
सिन्नर : वादळवाऱ्याने पडलेले विजेचे खांब उभे करण्यासाठी शेतकरी, घरगुती ग्राहकांना पैसे मोजावे लागत असल्याने त्यांची पिळवणूक थांबविण्याची मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे. मनसेने महावितरणाच्या धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने तालुक्यातील अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले आहे. ते उभे करण्यासाठी शेतकरी, घरगुती वीज ग्राहक यांना लोकवर्गणीतून पैसे द्यावे लागत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केल्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात अगोदरही सदर प्रकार घडला होता; परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मनसे तालुकाध्यक्ष विलास सांगळे आणि पदाधिकाऱ्यांनी केला आहे. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व वाढलेले आहे. सध्या शेतपिकांच्या लागवडीचे दिवस असून विजेची मोठी गरज आहे. परंतु महावितरणच्या हलगर्जीमुळे ग्रामीण भागात शेतकरी व ग्राहकांना अंधाराच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. याबाबत मनसेच्यावतीने महावितरणला एकदा निवेदन दिले होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मनसेचे तालुकाध्यक्ष सांगळे, महिला तालुका अध्यक्ष अॅड. भाग्यश्री ओझा, शरद घुगे, एकनाथ दिघे, वैभव शिरसाट, ज्ञानेश्वर कातकाडे आदींसह मनसैनिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.