पारा ४०.३ अंशावर : चार दिवसांपासून नाशकात उष्णतेचा कहर
By Admin | Updated: March 29, 2017 18:16 IST2017-03-29T18:07:10+5:302017-03-29T18:16:20+5:30
गेल्या चार दिवसांपासून नाशिकचे कमाल तपमान ४०.३ अंशावर असून उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे शहरात उष्म्याने कहर केला आहे.

पारा ४०.३ अंशावर : चार दिवसांपासून नाशकात उष्णतेचा कहर
नाशिक : गेल्या चार दिवसांपासून नाशिकचे कमाल तपमान ४०.३ अंशावर असून उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे शहरात उष्म्याने कहर केला आहे. यामुळे नागरिकांच्या जीवाची लाही लाही होत आहे. एक दशकानंतर नाशिककर पुन्हा मार्चमध्ये एवढा प्रचंड उन्हाचा तडाखा अनुभवत आहे.
गेल्या बुधवारपासून तपमानाचा पारा ३८च्या घरात होता; मात्र रविवारी पाऱ्याने चाळीशी गाठल्याने तपमानाची नोंद ४०.१ इतकी करण्यात आली. रविवारपासून सातत्याने तपमानाचा पारा चढता राहत असून पारा ४०.३वर स्थिरावत असल्याने वातावरणात उष्मा कायम आहे. बुधवारी (दि.२९) ४०.३ अंश इतक्या कमाल तपमानाची नोंद हवामान खात्याकडून करण्यात आली.
वाढत्या तपमानामुळे नाशिककरांना उन्हाचा तीव्र चटका बसत असून उष्म्याच्या त्रासाने नागरिक हैराण झाले आहे. दिवसभर शहरातील सर्वच खासगी कार्यालयांसह दुकानांमध्येही वातानुकूलित यंत्रांच्या वापरावर भर दिला जात होता. त्याचप्रमाणे खासगी क्षेत्रातील नोकरदारांसह बाळगोपाळांकडून शीतपेय व थंड फळहार करून शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न नाशिककरांकडून केला जात होता. दिवसभर शहरातील सर्वच रस्ते निर्मन्युष्य झाले होते. यामुळे खासगी वाहतूक ीबरोबरच एसटी महामंडळाच्या बसेसमध्येही तुरळक गर्दी दिसून आली. . वाढत्या उष्म्याबरोबरच वाराही बंद असल्यामुळे नागरिकांच्या जीवाची लाही लाही होत होती.