माध्यमांनी सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करावे
By Admin | Updated: August 12, 2014 01:59 IST2014-08-12T01:52:32+5:302014-08-12T01:59:33+5:30
माध्यमांनी सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करावे

माध्यमांनी सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करावे
नाशिक : भारतीय वृत्तपत्रसृष्टीचा उज्ज्वल इतिहास आहे. गांधी, आंबेडकर, टिळक यांनी आपल्या वृत्तपत्रांतून सामान्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली. माध्यमांनी सामान्य जनतेचे प्रश्न मांडून त्यांचे प्रतिनिधित्व करावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी ‘दैनिक लोकपर्याय’च्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना केले.
महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित सोहळ्यात बोलताना पी. साईनाथ यांनी माध्यमांच्या जबाबदाऱ्यांविषयी बोलताना सांगितले, वृत्तपत्रांची संख्या वाढते आहे परंतु पत्रकारिता कमी होत चालली आहे. समाजात अनेक प्रश्न आहेत. सन २०११ मध्ये झालेल्या जनगणनेच्या माध्यमातून काही प्रश्नांची गंभीरता समोर आली. १९९९ ते २०११ या कालावधीत देशात शेतकऱ्यांची संख्या १५० लाखांनी कमी झाली, तर शेतमजुरांची संख्या दुप्पट-तिप्पट बनली. याचा अर्थ शेतकरीच शेतमजूर बनला आहे. २००५ ते २०१० या कालावधीत १४० लाख नोकऱ्या कमी झाल्या. माध्यमांनी या प्रश्नांवर आवाज उठवून चर्चा केली पाहिजे. बंद कारखाने, शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या यांसारखे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे. माध्यमांतून सामान्य जनतेचा आवाज ध्वनित झाला पाहिजे, असे सांगून साईनाथ यांनी पेडन्यूज प्रकरणाचाही समाचार घेतला. दरम्यान, ज्येष्ठ साहित्यिक दीनानाथ मनोहर, ‘फॅँड्री’ या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे, मुख्य संपादक राजेंद्र साठे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अॅड. वसुधा कराड यांनी, तर सूत्रसंचालन सीमा पेठकर यांनी केले. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार कुमार शिराळकर, सुनीता जायभावे, बिडवे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)