मनमाडचा पाणीप्रश्न बिकट

By Admin | Updated: December 26, 2015 00:18 IST2015-12-26T00:17:03+5:302015-12-26T00:18:55+5:30

नरेंद्र दराडे : पिण्याच्या पाण्यासाठी पालखेडचे तत्काळ आवर्तन द्या

Manmad's water question is complicated | मनमाडचा पाणीप्रश्न बिकट

मनमाडचा पाणीप्रश्न बिकट

येवला : पालखेड डाव्या कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी बिगर सिंचन आवर्तन मजूर आहे, ते द्यायचे आहेच मग जिल्हा प्रशासन उशीर का करत आहे. पाणी योजनांच्या साठवण तलावांनी तळ गाठला असून, यामुळे मनमाडला नागरिकांचे सर्वाधिक हाल सुरू आहेत. अनेकांना तर पिण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. पालखेडच्या भरवशावर असलेल्या गावांतील चित्रही कठीण आहे. त्यामुळे पालखेडचे आवर्तन त्वरित देण्याची मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी केली आहे.
सिंचनाला एक आवर्तन देणे गरजेचे होते, त्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलने केली; पण जलसंपदा विभागाने याची दखल घेतली नसल्याने एका पाण्याअभावी रब्बीचे पीक हातचे गेले असून, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पाटबंधारे विभागाने लेखी पत्र देत पाणी सिंचनाला देणार नसल्याचे सांगत पिण्यासाठी आरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. मग आता प्यायला पाणी शिल्लक राहिले नसताना आवर्तन देण्यास उशीर का केला जात आहे, असा सवाल दराडे यांनी केला आहे.
मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारा साठवण तलवाचा गाळ उघडा पडला आहे. त्यामुळे २० दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे. येवल्यालादेखील आवर्तन लांबल्याने सहा दिवसाआड पाणीपुरवठा पालिकेने सुरू केला असून, येवला ३८ गाव योजनेच्या साठवण तलावाने तळ गाठल्याने पाणीकपात सुरू झाली आहे. आवर्तन लांबवले जात असल्याने गावोगावच्या पाणी योजना तसेच वाड्यावस्त्यांवरदेखील विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. परिणामी शहरात तसेच काही गावांमध्येही नागरिक विकत पाणी घेऊन गरज भागवत आहे. जनावरांनादेखील प्यायला पाण्याचा अभाव जाणवत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी मनमाड येथील बैठकीत डिसेंबरच्या शेवटापर्यंत प्यायला आवर्तन देतो असे सांगितले; पण अजून कुठलीच हालचाल नसल्याने नागरिकांचे पाण्याअभावी हाल सुरू आहेत. गावोगावी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न आणि वाड्यावस्त्यांवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यामुळे येवल्यातील गावोगावचे पिण्यासाठी आरक्षित असलेले सर्व २६ बंधारेदेखील या आवर्तनातून भरून द्यावेत म्हणजे ग्रामीण भागातील टंचाई दूर होण्यास मदत होणार असून, आता सर्वत्र पाणी संपल्याने तत्काळ आवर्तन सोडावे, यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे दराडे यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Manmad's water question is complicated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.