माळीण आपत्ती नैसर्गिक नव्हे मानवनिर्मित !

By Admin | Updated: August 7, 2014 02:03 IST2014-08-07T00:52:19+5:302014-08-07T02:03:45+5:30

माळीण आपत्ती नैसर्गिक नव्हे मानवनिर्मित !

Malini disaster is not natural, but man-made! | माळीण आपत्ती नैसर्गिक नव्हे मानवनिर्मित !

माळीण आपत्ती नैसर्गिक नव्हे मानवनिर्मित !

माळीण गावावर आलेले संकट नैसर्गिक की मानव निर्मित ही चर्चा चालू आहे. कृषी संचालनालयाने अतिवृष्टीचे कारण पुढे करून त्या संकटाचा मानवी स्पर्श नाकारला आहे. या प्रसंगाची तांत्रिक बाजू पाहता हा प्रकार केवळ नैसर्गिक नाही. तो तसा असता तर दर वर्षाच्या पावसाळ्यात त्याचे लहान-मोठे परिणाम दिसले असते. गावकऱ्यांच्या अनुभवास काही तरी आले असते. पण तेथे काही वर्षांपूर्वी असे काही घडले नव्हते, हे निश्चित आहे.
माळीण गावाशेजारच्या डोंगर दरडीतून पाणीदार चिखल, मऊ माती पहाटेच्या प्रहरी गावावर घसरली. लोक झोपेत असताना हा प्रकार घडला. मातीच्या हजारो टन वजनाचा लगदा गावावर घसरला. त्यातून सावरायला लोकांना वेळ मिळाला नाही.
गावामागची दरड मातीचीच होती. त्यात दगड, खडक, गोटे असे काहीही नव्हते. होता तो फक्त ओल्या मातीचा लगदा. तो लगदा अति पातळ व प्रवाही झाला. त्यातून वरून पाणीप्रवाह एकाकी ओसंडला आणि मातीचा लगदा घेऊन गावावर विसावला. हीच मुख्य प्रक्रिया घडली आहे.
गावाशेजारच्या डोंगर-माथ्यावरील पावसाचे पाणी गावात कधीच येत नव्हते. तसे ते यापूर्वी आले असते तर गावातून एक नाला, घळी पूर्वीच गेलेली असती. तसे काही पाहायला मिळत नाही. म्हणजे प्रवाही (लहान-मोठा) पाणी याच वर्षी ३० जुलैच्या रात्री गावावर ओसंडले व मातीचा लगदा घेऊन आले, हे सयुक्तिक वाटते.
यापूर्वीचे पावसाळ्याचे पाणी डोंगरमाथ्यावरून वाहत होते व ते आपल्या नाल्यातून, घळीतून वाहत जाऊन डोंगर उतार सोडून गावाखालच्या नदीला मिळत होते. हे नैसर्गिक नाले किंवा पर्जन्यप्रवाह यावर्षी बंद झाले व पावसाचे पाणी गावाकडे फिरले. तसे होण्याचे कारण माथ्यावरचा जमीन विकास प्रकल्प दिसतो. माथ्यावरच्या जमिनीची बांध-बंदिस्ती कोणत्या तरी योजनेतून गेल्या वर्षीच केली आहे असे दिसते. शेतांना चांगले मोठे बांध घालून भातशेतीच्या कामी चांगले उपजाऊ खाचरं करण्याचा विचार तसा योग्यच म्हणावा लागेल.
तसे करताना उतार गावाच्या बाजूला येतो आहे, खाचरं पाण्याने भरल्यानंतर पाणी गावाकडे वळेल ही कल्पना यायला हवी होती. गावाच्या बाजूला येणारा उतार टाळता आला असता तर फार चांगले झाले असते.
कोणतीही बांध-बंदिस्ती ही तलावासारख्या तत्त्वाने केली जाते. खाचरांत पाणी साचावे व सर्व कोपऱ्यांत पसरावे याची व्यवस्था करावीच लागते. पण त्याच जास्त झालेल्या पावसाचे पाणी पुढे वाहून जाण्यासाठी ‘सांडवा’ (हं२३ी ही्र१ - वेस्ट वेअर) सोडावाच लागतो. सांडवा सोडला नाही तर बांध फुटून पाणी भलत्याच ठिकाणी बाहेर पडेल यात शंका घेण्याचे कारण संभवत नाही.
माळीणच्या शेतजमीन विकास प्रकल्पांत बांध-बंदिस्तीची योजना अपूर्ण वा पूर्णपणे पार पडली आहे. त्या नव्या खाचरांत जास्त पाणी साचले, त्याचा दाब नव्या कच्च्या बांधावर पडला व ते फुटणे व पाणी खाली ओसंडणे हे क्रमप्राप्त आहे.
माळीण जमीन विकास प्रकल्पात एकच फार लहानशी चूक झाली किंवा किंचितसे दुर्लक्ष झालेले दिसते. गावावर पाणी यावे अशी कल्पना कोणीच करणार नाही. आपल्या कामामुळे गावावर संकट येईल, असा विचार कोणीही तज्ज्ञ करणार नाही. शेकडो माणसांचे प्राण हिरावणारी कृती कोणी जाणूनबुजून करणारच नाही. लहानशी चूक किंवा दुर्लक्ष झाले असावे ते सांडवा सोडण्यात. एक तर सांडवा सोडलाच नाही किंवा सोडला असेल तर तो योग्य ठिकाणी व योग्य आकाराचा सोडला नाही हेच खरे दिसते.
प्रकल्पाचा सांडवा योग्य ठिकाणी सोडला असता तर पावसाचे पाणी पूर्वीच्या नैसर्गिक नाल्यातून गावाखालच्या नदीला मिळाले असते व संकटाचे काहीच कारण नव्हते. सांडव्याच्या गैरउपस्थितीत सारा प्रकार एक सैतानी, अस्मानी संकटासारखा गावावर रात्रीच्या अंधारात कोसळला ते तर्कसंगत दिसते. थोडा सुलतानी स्पर्शही झाला असावा.
डोंगरमाथ्याच्या शेतांची बांध-बंदिस्ती झाली आहे. पाऊस सारखा पडत आहे. ३० जुलैच्या रात्री १७५ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद शेजारीच आहे. हे प्रमाण अतिवृष्टीत काय पण ढगफुटीतसुद्धा बसते. ती लहान-मोठी भावंडेच आहेत.
अचानक कोसळलेल्या पावसाचे पाणी खाचरांत बरेच आधी साचत होते. खालची माती झिरपणारी (ढी१५्रङ्म४२) पद्धतीची आहेच. खाचरांत जास्त साचलेले पाणी मातीत मुरत होते. माळीण गावातल्या घरांत पाण्याचे झरे पैदा झाले याला दुसरे कोणतेही कारण नाही.
३० जुलैच्या रात्री पावसाचे प्रमाण अचानक वाढले. त्या पाण्याचा नैसर्गिक निचरा करण्याची व्यवस्था जमीन सुधार प्रकल्पात नव्हती. त्यामुळे पाणी खाचरांत साचत येऊन त्याची पातळी वाढवीत होते. गावाशेजारचा बांध जरा मोठ्या आकाराचा होता. जमिनीचा उतार गावाच्या दिशेला होता. अचानक वाढलेल्या प्रमाणाला तोंड देण्याची शक्ती त्या बांधात नव्हती. त्यावरून रात्री १ वाजता पाणी फिरले. मागच्या पाण्याने बांध गावाकडे लोटला. साचलेले पाणी, पावसाचे पाणी, वरच्या बांधातले पाणी गावाकडे झेपावले. खाली आधीच लगदा झालेला मातीचा गोळा रात्री १.३० ते २ च्या दरम्यान गावावर लोटला गेला. दरडीच्या मातीचा आकार व पाण्याचे प्रमाण फार मोठे असल्याने अर्धेअधिक गाव झाकून टाकण्यास व वरचे स्तर देण्यास पुरेसे ठरले.
ही सर्व प्रक्रिया अभ्यासताना पाण्याचा निचरा होण्यासाठी, खाचरातील पाण्याचा योग्य विसर्ग होण्यासाठी प्रभावी उपाययोजना असती तर असे घडलेच
नसते.
अर्थात पुन: सांगावेसे वाटते की, हा प्रकार सहेतूक नाहीच. लहानशी चूक झाली. वेळेवर दुर्लक्ष झाले व ती चूक फार महाग पडली. त्यामुळे माळीन मलीन झाले व मयत झाले. एखाद्या डॉक्टरकडून आॅपरेशन करताना पोटात कात्री विसरून राहावी, एखाद्या इंजिनिअरने भुसभुशीत पाया समजून अनेक मजली इमारत बांधावी व त्यातून घडणारा परिणाम हेतूत: नसेल तर चूक किंवा दुर्लक्ष अवश्य आहे, असेच म्हणावे लागेल.
जाहीरपणे शक्य नसेल तर हरकत नाही; पण तज्ज्ञांनीसुद्धा अंतर्मनात परीक्षण करून पश्चात्ताप करण्याची ही वेळ आहे. अंधारात का होईना, दोन अश्रू ढाळण्याची गरज आहे. किमान मृत आत्म्यांविषयी सद्भावनेने श्रद्धांजली अर्पण करण्याची आवश्यकता वाटते.
यापुढे मानवी विनाशाला कारणीभूत ठरणारी कृती आमच्या हातून होणार नाही, ही प्रतिज्ञाही लोकांना सध्या पुरेशी आहे. तसेच, प्रत्येक दरडीचा शोध नव्याने सुरू आहे. हे असे प्रकार केव्हातरी घडतात. हे सर्वत्र संभवत नाही. त्यालाही नैसर्गिक बंधने आहेत, हे प्रशासकांना सांगण्याचीही गरज आहे.
(लेखक भूगर्भ अभ्यासक आहेत.)

Web Title: Malini disaster is not natural, but man-made!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.