मालेगाव : चार बंबांनी आणली आग आटोक्यात जळगाव चोंढीनजीक ट्रक जळून भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:20 IST2017-12-17T22:51:53+5:302017-12-18T00:20:50+5:30
मालेगाव-मनमाड रस्त्यावर जळगाव चोंढीनजीक सकाळी साडेसहा वाजता आगपेट्या भरलेल्या ट्रकला अचानक आग लागून तो जळून खाक झाला. मनपाच्या चार बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

मालेगाव : चार बंबांनी आणली आग आटोक्यात जळगाव चोंढीनजीक ट्रक जळून भस्मसात
आझादनगर : मालेगाव-मनमाड रस्त्यावर जळगाव चोंढीनजीक सकाळी साडेसहा वाजता आगपेट्या भरलेल्या ट्रकला अचानक आग लागून तो जळून खाक झाला. मनपाच्या चार बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
तामिळनाडू येथून जयपूर येथे आगपेट्या भरून जात असलेल्या ट्रकला (क्र. टीएन ३४ डब्ल्यू ४७८६) सकाळी साडेसहा वाजता मालेगाव तालुक्यातील जळगाव चोंढीनजीक अचानक आग लागली. याची माहिती जवळील पेट्रोलपंप चालकास कळताच त्यांनी तालुका पोलिसांना याची माहिती दिली. तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश गावित यांनी सदर माहिती मनपाच्या अग्निशमन दलास देत घटनास्थळी धाव घेतली.
मालेगाव महानगरपालिकेच्या चार बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. परंतु मालेगावपासून घटनास्थळ लांब असल्याने बंबांना वेळ लागल्याने व ट्रकमध्ये आगपेट्या असल्याने आगीने अवघ्या काही वेळातच रौद्ररूप धारण करून ट्रक आपल्या कवेत घेतला. त्यामुळे ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. सुदैवाने ट्रकचालकाने प्रसंगावधान राखून सहकाºयांसह पळ काढल्याने त्यांचे प्राण वाचले. उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
प्रसंगावधानामुळे ट्रकचालकाचे प्राण वाचले
मालेगाव-मनमाड रस्त्यावर जळगाव चोंढीनजीक अचानक आगपेटीच्या ट्रकला आग लागली. यावेळी ट्रकचालक युवराज मुरकेशन याने प्रसंगावधान राखून ट्रकमधुन उडी घेतली. यामुळे त्याचे प्राण वाचू शकले. ट्रकसह लाखोंचा मुद्देमाल आगीत जळून खाक झाला. ट्रकमालक नागराज रंगास्वामी, रा. कुटीपिंटमंगळ (तामिळनाडू) याने तालुका पोलिसांत खबर दिली. पोलिसांनी अकस्मात घटनेची नोंद केली.