नेता बोले, तरीही दल ना हले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 01:26 IST2021-07-25T01:21:05+5:302021-07-25T01:26:14+5:30
नेत्यांमधील विसंवाद, एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न ही कारणे त्यामागे आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यानंतर उद्भवलेली ही स्थिती पाहता भाजपसारख्या शिस्तबद्ध पक्षापुढे भविष्यात मोठी आव्हाने आहेत उभी ठाकतील, हे उघड आहे.

नेता बोले, तरीही दल ना हले !
मिलिंद कुलकर्णी
बेरीज वजाबाकी
राजकारण हे अळवावरच्या पाण्यासारखे आहे. हाती सापडत नाही. त्याचा रंग वेगळाच आहे. भल्या भल्यांना चकवा देते. त्यात सत्तेला फार महत्त्व असते. ती नसेल तर पक्ष, कार्यकर्ते सांभाळणे जिकिरीचे होते. याचा अनुभव नाशिक जिल्ह्यात दोन राष्ट्रीय पक्षांच्या प्रदेश नेत्यांनी घेतला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाशिकला तीन दिवस मुक्काम ठोकून शहर व ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी यांच्या व्यक्तिगत भेटी घेऊन पक्षांतर्गत स्थिती समजून घेतली. पाटील यांच्या संघटन कार्यातील दांडगा अनुभव, त्यांचा पक्षातील दरारा पाहता भाजपमधील विस्कटलेली घडी सुरळीत होईल, अशी आशा निर्माण झालेली असतानाच दोन दिवसांनी झालेल्या महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपने हक्काची जागा गमावली. नेत्यांमधील विसंवाद, एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न ही कारणे त्यामागे आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यानंतर उद्भवलेली ही स्थिती पाहता भाजपसारख्या शिस्तबद्ध पक्षापुढे भविष्यात मोठी आव्हाने आहेत उभी ठाकतील, हे उघड आहे. संकटमोचक म्हणून लौकिक मिळविलेल्या गिरीश महाजन यांनी नाशिकचे पाच वर्षे पालकमंत्रिपद भूषविले. या काळात त्यांनी महापालिकेत स्वबळावर सत्ता आणली. मात्र सत्ता राबविताना पक्षांतर्गत सुंदोपसुंदी रोखणे त्यांनाही अवघड गेले. राज्यातील सत्ता जाताच महाजन यांच्याऐवजी नाशिकची संघटनात्मक जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांचे दुसरे विश्वासू सहकारी जयकुमार रावल यांच्याकडे सोपविण्यात आली. प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीमुळे रावलांना पक्षातील बेदिलीचा अंदाज आला असेल. त्यांची पुढील व्यूहरचनाही या अनुभवावर बेतलेली असेल. कॉंग्रेस या दुसऱ्या राष्ट्रीय पक्षाचे प्रदेश निरीक्षक विनायक देशमुख यांनी जिल्ह्यातील कॉंग्रेसजनांची बैठक बोलावली. या बैठकीत मनमाड, दिंडोरी, सुरगाणा, बागलाण, देवळा येथील तालुकाध्यक्षांच्या बदलाविषयी चर्चा होणार होती. मात्र याविषयावरून बैठकीत गदारोळ झाला. तालुकाध्यक्षांचा आढावा त्या तालुक्यात जाऊन घ्यायला हवा, तो घेतला का, असा प्रतिसवाल प्रदेश निरीक्षकांना विचारण्यात आला. जिल्हाध्यक्षांच्या निष्क्रियतेविषयी काहींनी तक्रारी केल्या. जिल्ह्यात पक्षाचे एकमेव आमदार असताना त्यांना बळ देण्यासाठी प्रदेश समिती व वरिष्ठांनी काय केले? अशी विचारणा करण्यात आली. राज्याचे मंत्री जिल्ह्यात फिरकत नाही. राज्याच्या सत्तेचा लाभ पक्षाला कसा मिळेल, अशी कैफियत मांडण्यात आली.
एकटे पडल्यावर नारा काय उपयोगाचा?
काँग्रेसजनांची या बैठकीतील व्यथा रास्त आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सत्तेतील भागीदार पक्ष जिल्ह्यात सत्ता राबविताना दिसून येतात. मंत्री, आमदार मंत्रालयातून विकासकामे मंजूर करून आणतात आणि त्याचा गवगवा करतात. भाजपनेदेखील खासदार डॉ.भारती पवार यांना केंद्रात मंत्रिपद देऊन नाशिकला महत्व दिले आहे. आदिवासी समाजाला जोडले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष केवळ भूतकाळातील कामगिरीवर पुढे वाटचाल करू शकणार नाही. वर्तमानकाळात तुम्ही काय केले, हे मतदारांना सांगावे लागणार आहे. काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांच्या शिक्षणसंस्था, कार्यक्षेत्र, नातेसंबंध नाशिक जिल्ह्यात आहेत; पण ते पक्षवाढीत लक्ष घालत नाही, अशी तक्रार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही दौरा रद्द झाला. काँग्रेसजनांना त्यांची व्यथा मांडायला विनायक देशमुख आयते सापडले आणि त्यांना टीकेचा भडिमार सहन करावा लागला. प्रदेशाध्यक्ष ह्यएकला चलो रेह्णचा नारा देत असले तरी जिल्ह्यात काँग्रेस पक्ष एकटा पडला आहे हे वास्तव कधी समजून घेतले जाणार? महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आतापासून सुरू झाल्याचे राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांमुळे दिसून येत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा दोन दिवसांचा दौरा याच पार्श्वभूमीवर होता. मनसेतील गटबाजीची चर्चा त्यांच्या दौऱ्याच्या वेळी झाली. जुने व युवक असे दोन गट असून, दोघांनी राज ठाकरे यांच्याकडे बाजू मांडली. राज यांनी चातुर्य दाखवत पुत्र अमित यांना बोलावून त्यांना परिस्थितीचा अंदाज घ्यायला सांगितला. कोणालाही कोणतेही आश्वासन न देता त्यांनी चर्चेचा सगळा फोकस अमित ठाकरे यांची एन्ट्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची झालेली भेट यावरच ठेवला. त्यामुळे पक्षांतर्गत खदखद, नाराजीच्या बातम्या बाहेर आल्या नाहीत. राज यांची पक्षावरील पकड आणि टायमिंग परफेक्ट असते, हे पुन्हा एकदा दिसून आले.
याउलट चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेतील पाच वर्षांच्या भाजपच्या कामगिरीचे प्रसारमाध्यमात नकारात्मक चित्रण येत असल्याची भूमिका मांडली. नाशिककरांच्या अपेक्षांवर भाजपने बोळा फिरवल्यानंतर ही मल्लीनाथी जखमेवर मीठ चोळणारी आहे हे पाटील यांना लक्षात कसे आले नाही, याचे आश्चर्य वाटते.