खेडलेझुंगे परिसरात द्राक्ष मण्यांना तडे, बागायतदार हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 17:20 IST2021-01-10T17:19:39+5:302021-01-10T17:20:10+5:30
खेडलेझुंगे : मागील आठवड्यापासून वातावरणातील सततच्या बदलामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. वातावरणातील बदलामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडत चालला आहे. मागील ३/४ दिवसांपासून अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, धुके, दव, कडाक्याचा गारठा, यामुळे पाणी उतरलेल्या/साखर उतरलेल्या द्राक्षांच्या मण्यांना तडे जात आहेत. त्यामुळे परिसरातील द्राक्ष बागायतदारांचे नुकसान होत आहे. अर्ली द्राक्ष बागायतादारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करून वाचविलेल्या बागा अवकाळीमुळे नुकसानग्रस्त होत आहेत. त्यामुळे शेतकरी पूर्णतः हतबल झालेला आहे.

खेडलेझुंगे परिसरात द्राक्ष मण्यांना तडे, बागायतदार हवालदिल
मागील वर्षीचे काढणीला आलेले पीक कोविड १९ मुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये सापडले. बाजारपेठा कधी चालू तर कधी बंद, निर्यात बंदी, शेतीमालाला नसलेला भाव, यामुळे मागील वर्षीचे नुकसान सहन करीत नव्याने या वर्षी केलेली मशागत आणि खर्चही अवकाळीमुळे वाया जाणार असल्याचे चिन्ह परिसरात दिसून येत आहे. डाळिंब बागायतदार यांनी फळधारणा जोमाने होण्यासाठी बगीचांना पाण्याचा ताण देण्यास सुरुवात केलेली असतानाच, झालेल्या पावसामुळे त्यांच्याही पदरी निराशा पडलेली आहे. त्यामुळे या वर्षी द्राक्ष आणि डाळिंब बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. घडांवर पाणी शिल्लक राहत असल्याने, घड सडू लागले आहेत. मणी क्रॅक झाल्याने पूर्ण घड सडणार आहे. मावा, तुडतुडे यांसारख्या किटकांचा वावर वाढणार आहे. त्यामुळे किटकनाशकांचा खर्च वाढणार आहे.