शाश्वत विकासासाठी विवेकबुद्धी जागृत ठेवा : तुकाराम मुंढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:48 IST2018-06-21T00:48:40+5:302018-06-21T00:48:40+5:30

शहराचे जीवनमान उंचविण्यासाठी स्वयंरोजगार निर्मितीसह मूलभूत सोयीसुविधांचा दर्जा सुधारणे आवश्यक आहे. स्मार्ट शहराकडे वाटचाल करताना मूलभूत सोयीसुविधा पुरविणे महापालिकेची जबाबदारी आहे. कारण ‘स्मार्ट शहर’ केवळ नावापुरते असून चालणार नाही. त्यासाठी शाश्वत विकास गरजेचा आहे,

Keep awake sense of perpetual development: Tukaram Mundhe | शाश्वत विकासासाठी विवेकबुद्धी जागृत ठेवा : तुकाराम मुंढे

शाश्वत विकासासाठी विवेकबुद्धी जागृत ठेवा : तुकाराम मुंढे

नाशिक : शहराचे जीवनमान उंचविण्यासाठी स्वयंरोजगार निर्मितीसह मूलभूत सोयीसुविधांचा दर्जा सुधारणे आवश्यक आहे. स्मार्ट शहराकडे वाटचाल करताना मूलभूत सोयीसुविधा पुरविणे महापालिकेची जबाबदारी आहे. कारण ‘स्मार्ट शहर’ केवळ नावापुरते असून चालणार नाही. त्यासाठी शाश्वत विकास गरजेचा आहे, त्यामुळे शहराचे नागरिक या नात्याने शाश्वत विकास संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी विवेकबुद्धी जागृत ठेवावी, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले. डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे ५४वे पुष्प मूलभूत हक्क आंदोलन समितीच्या वतीने बुधवारी (दि.२०) परशुराम साईखेडकर सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुंढे यांनी ‘महानगर प्रशासन-शासन व नागरिक’ या विषयावर व्याख्यानातून प्रशासनाची व नागरिकांची कर्तव्ये-अधिकार, नगरनियोजन धोरण-अंमलबजावणी या बाबींचा आढावा घेतला. यावेळी मुंढे म्हणाले, नाशिककरांना आज पाणी मिळत असले तरी ते पुरेसे आणि गुणवत्तापूर्ण नाही. नाशिकमध्ये भविष्यात २४ तास पाणीपुरवठा व्हावा, हा प्रयत्न राहणार आहे. ज्या नवीन वसाहती उदयास येत आहे तेथे पिण्याच्या पाण्याच्या उपजलवाहिन्या टाकणे तसेच जलवाहिन्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. यासाठी ५० कोटींची गरज आहे, मात्र त्यासाठी कोणीही प्रश्न उपस्थित करीत नाही, असेही मुंढे म्हणाले. भूमिगत ड्रेनेजची व्यवस्था सुधारायची असेल तर त्यासाठी कर लावावा लागेल, कारण त्या सुविधेचा दर्जा सुधारण्यासाठी खर्च करावा लागणार आहे. तो खर्च कर स्वरूपात भागवावा लागणार आहे. तरच गोदावरी शुद्ध होईल आणि सांडपाण्याची विल्हेवाट लागेल.
‘नाशिक माझं घर’
नाशिक हे शहर माझे घर आहे. घर चांगले रहावे, ही माझी जबाबदारी आहे. घर चालविताना मला कर्तव्याची जाणीव करून द्यावीच लागणार आहे. या शहरात नागरिकांना सर्व मूलभूत सोयीसुविधा चांगल्या दर्जाच्या मिळाव्या यासाठी मला कर आकारावे लागेल, पण करवाढ नियमबाह्य मुळीच राहणार नाही, याचा विश्वास बाळगावा, असे मुंढे म्हणाले.
...म्हणून नाशिककर भाग्यवान
सोलापूरला पिण्याचे पाणी दूषित स्वरूपाचे असल्याचे सिद्ध झाले आहे. नाशिककर भाग्यवान आहे की, गंगापूर, मुक णे या धरणांच्या वरच्या बाजूस मोठी शहरे नाहीत. नैसर्गिक स्त्रोत हे वैयक्तिक मालकीचे नसून सामूहिक मालकीचे आहे, त्यावर सर्वांचा अधिकार आहे, असा दृष्टिकोन जोपर्यंत विकसित होत नाही, तोपर्यंत शाश्वत विकासाची संकल्पना अमलात येऊ शकत नाही, असे मुंढे म्हणाले.

Web Title: Keep awake sense of perpetual development: Tukaram Mundhe