कळसूबाई शिखर आता झळाळणार
By Admin | Updated: June 26, 2014 01:02 IST2014-06-26T00:54:46+5:302014-06-26T01:02:17+5:30
कळसूबाई शिखर आता झळाळणार

कळसूबाई शिखर आता झळाळणार
नाशिकरोड : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राज्यातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखरावर महावितरणच्या विद्युतवाहिन्या, रोहित्रचे काम पूर्ण झाल्याने कळसूबाई शिखर आता रात्रीदेखील विजेच्या प्रकाशात चमकू लागणार आहे. यामुळे पर्यटकांची आता मोठी सोय झाली आहे.
कळसूबाई शिखर महावितरण राजूर उपविभागाच्या कार्यक्षेत्रात येते. कळसूबाई शिखराची उंची समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर म्हणजेच सुमारे ५४०० फूट इतकी आहे. कळसूबाई शिखर हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येत असून, त्याकरिता विद्युतीकरण करणे अत्यावश्यक होते. त्यानुसार शिखराच्या पायथ्याशी असलेल्या बारी गावापासून शिखरापर्यंत ११ केव्ही दाबाची सुमारे तीन किमी लांबीची भूमिगत वाहिनी टाकण्याचे व शिखरावर ६३ केव्हीए क्षमतेचे रोहित्र बसविण्याचे व लघुदाब वाहिनी उभारण्याचे अवघड काम नुकतेच पूर्ण झाले. महावितरणने केलेल्या या कामाचे उद्घाटन
नुकतेच आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते बारी येथे झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे मुख्य अभियंता के. व्ही. अजनाळकर, अधीक्षक अभियंता दत्तात्रय कोळी, कार्यकारी अभियंता डी. बी. गोसावी, सहायक अभियंता व्ही. ए. बाऊस्कर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष म्हणजे सदर कामाची मुदत आॅगस्ट २०१४ असताना दोन महिने आधीच काम पूर्ण करण्यात आले. (प्रतिनिधी)