उद्योगाच्या विकासाचा प्रवास हा बदलावर अवलंबून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:53 IST2019-03-05T00:53:16+5:302019-03-05T00:53:31+5:30
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना आपल्या कक्षा सोडून मोठे होताना विविध पातळीवर बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी उद्योगाच्या विकासाचा प्रवास हा मानसिकतेतील बदलासोबतच दृष्टिकोनातील बदलावर अवलंबून आहे.

उद्योगाच्या विकासाचा प्रवास हा बदलावर अवलंबून
सातपूर : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना आपल्या कक्षा सोडून मोठे होताना विविध पातळीवर बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी उद्योगाच्या विकासाचा प्रवास हा मानसिकतेतील बदलासोबतच दृष्टिकोनातील बदलावर अवलंबून आहे. अन्यथा मोठे अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते, असे प्रतिपादन निर्लेप समूहाचे माजी अध्यक्ष राम भोगले यांनी केले.
राष्ट्रीय स्तरावरील लघुउद्योग भारती या संस्थेच्या रजत जयंती वर्षानिमित्त नाशिक शाखेच्या वतीने औद्योगिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील उद्योजकांच्या उपस्थितीत ‘उद्योग विकास, एक दृष्टिकोन’ या विषयावर बोलताना भोगले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, उद्योग व्यवसाय करताना प्रत्येकाने नियम, कायदा पाळायचा असतो. दृष्टिकोन असला तर यशाकडे जाण्याचे मार्ग मोकळे होतात.
प्रमुख पाहुणे म्हणून एबीबी कंपनीचे उपाध्यक्ष गणेश कोठावदे यांनीही मार्गदर्शन केले. प्रदीप पेशकार यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक भाषणात अध्यक्ष संजय महाजन यांनी लघुउद्योग भारतीच्या प्रवासाचा आढावा सादर केला. लघुउद्योग भारतीच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या माजी अध्यक्ष विवेक गोगटे, राजेंद्र छाजेड, ओमप्रकाश कुलकर्णी, डी. जी. जोशी, सतीश सिरोंजकर, मारुती कुलकर्णी, विराज लोमटे, मिलिंद कुलकर्णी, बाळकृष्ण नांद्रे, रमेश कनानी, तुषार पटवर्धन यांचाही सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन धनलक्ष्मी पटवर्धन यांनी केले. मिलिंद देशपांडे यांनी आभार मानले. याप्रसंगी अजय लगड, बाळासाहेब गुंजाळ, मिलिंद कुलकर्णी, अतुल देशमुख, सिद्धार्थ पाटील, निशिकांत आहिरे, कैलास आहेर, तुषार चव्हाण आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन धनलक्ष्मी पटवर्धन यांनी केले. मिलिंद देशपांडे यांनी आभार मानले.