जंगलीदास महाराज भाविकांवर साधूंनी उगारल्या तलवारी

By Admin | Updated: September 5, 2015 22:39 IST2015-09-05T22:37:23+5:302015-09-05T22:39:41+5:30

साधुग्राममध्ये धुमश्चक्री : मिरवणूक काढण्यावरून वाद; पोलिसांच्या मदतीने टळला अनर्थ

Jangliidas Maharaj swords attacked by the sadhus on the devotees | जंगलीदास महाराज भाविकांवर साधूंनी उगारल्या तलवारी

जंगलीदास महाराज भाविकांवर साधूंनी उगारल्या तलवारी

नाशिक : शाहीमार्गावरून मिरवणूक काढण्याच्या आखाडा परिषदेच्या अधिकाराचा भंग करून मिरवणूक काढणाऱ्या जंगलीदास महाराज प्रणीत आत्मा मालिक ध्यानपीठाच्या भाविकांवर साधुग्राममधील साधू-महंतांनी हल्लाबोल केला. संतप्त साधूंनी मिरवणुकीतील वाहनाची तोडफोड करीत भाविकांवर लाठ्या, तलवारी उगारल्याने एकच गोंधळ उडाला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी
करीत आत्मा मालिक ध्यानपीठाची मिरवणूक अन्य मार्गाने वळवल्याने अनर्थ टळला.
कुंभमेळ्यात यंदा प्रथमच कोकमठाण येथील विश्वात्मक जंगलीदास महाराज आश्रम ट्रस्टच्या वतीने औरंगाबाद रोडवर आत्मा मालिक ध्यानपीठाची उभारणी करण्यात आली असून, या पीठाच्या वतीने शनिवारी दिंडी सोहळा व शाहीस्नान पर्वणीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त दुपारी साधुग्राममधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणूक साधुग्राममधून शाहीमार्गानेच गोदाघाटावर जाणार होती. विविध सुशोभित रथ व हजारो भाविकांचा समावेश असलेल्या या मिरवणुकीची रीतसर परवानगी पोलिसांकडून घेण्यात आली होती. तथापि, साधुग्राममधील शाहीमार्गावरून मिरवणूक काढण्याचा अधिकार व मान केवळ आखाडा परिषदेच्या साधू-महंतांनाच असून, २० आॅगस्ट ते १८ सप्टेंबर या कालावधीत या मार्गावरून कोणालाही मिरवणुकीची परवानगी देऊ नये, त्यासाठी आधी आखाडा परिषदेची परवानगी घ्यावी, अशा आशयाचे पत्र आखाड्यांनी आधीच पोलिसांना दिले होते. त्याला पोलिसांनी मान्यताही दिली होती; मात्र तरीही पोलिसांनीच आत्मा मालिक ध्यानपीठाच्या आजच्या मिरवणुकीला परवानगी दिल्याने सदर प्रसंग ओढावल्याचे वृत्त आहे.
आत्मा मालिक ध्यानपीठाच्या वतीने दुपारी ३ च्या सुमारास इंद्रायणी लॉन्स येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. बॅण्ड, ढोल, झांज, लेजीम आदि अनेक पथकांचा समावेश असलेली ही मिरवणूक साधुग्राममधील दिगंबर अनी आखाड्या समोर जात होती. तेथे प्रमुख साधू-महंत जमले होते. मिरवणुकीच्या आवाजाने ते रस्त्यावर आले.

पळापळीने गोंधळ

संतप्त साधू-महंत मिरवणुकीवर चालून आल्याने भाविकांची एकच पळापळ झाली. नेमके काय झाले, हे कुणालाच कळेना. मिरवणुकीत लहान मुले, महिलांचाही समावेश होता. अचानक गोंधळ उडाल्याने अनेकांनी भीतीने जवळच्या खालशांमध्ये आश्रय घेतला.
.. म्हणून विरोध
साधुग्राममधील मुख्य मार्गावरून आखाड्यांच्या परवानगीशिवाय मिरवणूक काढता येत नाही. तसे पत्र यापूर्वी पोलिसांना देण्यात आले आहे. तरी मिरवणूक काढण्यात आल्याने विरोध केला.
- श्री महंत धरमदास,
निर्वाणी आखाडा




निर्वाणी आखाड्याचे श्री महंत धरमदास, निर्मोही आखाड्याचे श्री महंत राजेंद्रदास, दिगंबर आखाड्याचे श्री महंत कृष्णदास, महंत वैष्णवदास आदिंनी मिरवणूक थांबवून आत्मा मालिक ध्यानपीठाचे नंदकुमार सूर्यवंशी, मोहन शेलार, रवींद्र बागुल, भगवान दौंड, हनुमंत भोंगळे आदिंना मिरवणुकीच्या परवानगीबाबत विचारणा केली. त्यावर आपण पोलिसांची रीतसर परवानगी घेतल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले; मात्र सदर मार्गावर सध्या आखाड्यांचा अधिकार आहे, त्यावरून बॅण्डपथक व छत्र-चामरे, ध्वज उंचावून मिरवणूक काढण्यासाठी आखाड्यांची परवानगी घेणे आवश्यक असून, एकतर मिरवणूक अन्य मार्गाने वळवावी किंवा छत्र-चामरे, ध्वज खाली घेऊन गाजावाजा न करता मार्गक्रमण करावे, असे साधू-महंतांनी सांगितले. त्यावर एकमत होऊन मिरवणूक काहीशी पुढे सरकली; मात्र पुढे काही भाविकांनी छत्र-चामरे, ध्वज उंचावून जयघोष केल्याचे निदर्शनास येताच माघारी वळलेल्या साधू-महंतांनी संतप्त होऊन मिरवणूक रोखली व भाविकांना पुढे जाऊ देण्यास मज्जाव केला. अनेक साधू लाठ्या-काठ्या, तलवारी, कुऱ्हाडी, भाले आदि शस्त्रास्त्रे घेऊन आत्मा मालिक ध्यानपीठाच्या भाविकांवर चालून आले. काही भाविकांना धक्काबुक्की करीत मिरवणुकीतील एका वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करीत दोन्ही गटांची समजूत काढली. यावेळी साधू-महंतांनी त्यांच्याकडे असलेले मिरवणुकीचे अधिकारपत्र सादर केले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करीत मिरवणूक औरंगाबाद रोडमार्गे वळवली. पुढे गणेशवाडी, गौरी पटांगणावरून मिरवणूक शांततेत गोदाघाटावर मार्गस्थ झाली. तेथे भाविकांनी विधिवत पूजन व आत्मध्यान केल्यानंतर मिरवणुकीचा समारोप झाला.


विश्वासात घ्यावे
मिरवणुकीला परवानगी देताना पोलिसांनी तिन्ही अनी आखाड्यांना विश्वासात घ्यायला हवे होते, तसेच आत्मा मालिक ध्यानपीठाने आखाड्यांची परवानगी घेणे आवश्यक होते. तसे न झाल्याने मिरवणूक पुढे जाऊ दिली नाही.
- श्री महंत कृष्णदास, दिगंबर आखाडा
चौकशी करू...
साधुग्राममधील या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल. कोणाची तक्रार आल्यास तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील. तथापि, दोन्ही बाजूंनी समजूतदार भूमिका घेऊन वाद टाळावा.
- अविनाश बारगळ, पोलीस उपआयुक्त

ईर्षेतून घडलेला प्रकार
आत्मा मालिक ध्यानपीठ हा शांततामय मार्गाने चालणारा पंथ असून, साधुग्राममध्ये घडल्या प्रकाराबद्दल काही बोलावयाचे नाही. मिरवणुकीतील हजारोंचा जनसमुदाय पाहून बहुधा काहींना ईर्षा निर्माण झाली असावी व त्यातून हा प्रकार घडला असावा.
- हनुमंत भोंगळे, आत्मा मालिक ध्यानपीठ

Web Title: Jangliidas Maharaj swords attacked by the sadhus on the devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.