बालरोगतज्ज्ञ परिषदेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:27 IST2017-09-23T23:49:40+5:302017-09-24T00:27:59+5:30
भारतात पाच वर्षांखालील बालमृत्यूचे प्रमाण हे जगात सर्वात जास्त असून, ते नियंत्रणात आणण्यासाठी साध्या-सोप्या व अद्ययावत तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या अनुभवातून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या अतिदक्षता विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बी. पी. करु णाकर यांनी केले.

बालरोगतज्ज्ञ परिषदेचे उद्घाटन
नाशिक : भारतात पाच वर्षांखालील बालमृत्यूचे प्रमाण हे जगात सर्वात जास्त असून, ते नियंत्रणात आणण्यासाठी साध्या-सोप्या व अद्ययावत तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या अनुभवातून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या अतिदक्षता विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बी. पी. करु णाकर यांनी केले. येथील हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये नाशिक चॅप्टरने आयोजित केलेल्या तीनदिवसीय ‘महापेडिक्रीटीकॉन’ या राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. करुणाकर बोलत होते. भारतात अतिदक्षता विभाग बालरोग तज्ज्ञांची कमतरता असून ती भरून काढण्यासाठी संघटनेच्या वतीने एक वर्षाचा प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करण्यात येत असल्याची माहितीही डॉ. करुणाकर यांनी यावेळी दिली. एक महिना ते अठरा वर्षे वयोगटातील बालकांना गंभीर अवस्थेत आयसीयूमध्ये उपचार करण्याच्या विविध पद्धती व तंत्रज्ञान याविषयीची माहिती यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून देण्यात आली. त्यात डॉ. विनायक पत्की, डॉ. सुचित्रा रणजित, डॉ. धीरेन गुप्ता, डॉ. संजय घोरपडे, डॉ. धालिवाल, डॉ. मधुमती ओतीव यांचा समावेश होता. यावेळी झालेल्या कार्यशाळेत अनेक शोधनिबंध सादर करण्यात आले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी नाशिक चॅप्टरच्या अध्यक्ष संगीता बाफना, डॉ. केदार मालवतकर, डॉ. श्याम चौधरी, डॉ. पंकज गाजरे, डॉ. रमाकांत पाटील, डॉ. संजय आहेर आदी सहकार्य करित आहेत
गंभीर अवस्थेतील बालकांना आयसीयूमध्ये भरती केल्यानंतर त्यांना योग्य ते उपचार तज्ज्ञांमार्फत मिळण्यासाठी या परिषदेतून डॉक्टरांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्याच्या हेतूने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बालकांच्या अतिदक्षता उपचारांमधील नवनवीन तंत्रज्ञान व उपचार पद्धती यांचे आदान-प्रदान उपयुक्त ठरत असल्याचा दावा आयोजकांनी केला.