पर्यावरणमंत्र्यांच्या आदेशानंतरही चौकशीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:30 IST2021-09-02T04:30:48+5:302021-09-02T04:30:48+5:30

नाशिक : ब्रह्मगिरी येथे उत्खनन करताना जिलेटीनचा वापर करण्यात आल्याने या प्रकरणाची चौकशी करावी, असे आदेश पर्यावरण राज्यमंत्र्यांनी देऊनही ...

Ignoring the inquiry even after the order of the environment minister | पर्यावरणमंत्र्यांच्या आदेशानंतरही चौकशीकडे दुर्लक्ष

पर्यावरणमंत्र्यांच्या आदेशानंतरही चौकशीकडे दुर्लक्ष

नाशिक : ब्रह्मगिरी येथे उत्खनन करताना जिलेटीनचा वापर करण्यात आल्याने या प्रकरणाची चौकशी करावी, असे आदेश पर्यावरण राज्यमंत्र्यांनी देऊनही निर्धारित मुदतीत याबाबत कोणत्याही विकासकाची चौकशी करण्यात आली नसल्याने पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. मंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला सात दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपुष्टात आली आहे.

ब्रह्मगिरीसह संतोषा, भागडी येथील डोंगरावर सुरू असलेल्या उत्खननप्रकरणी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या दालनात दि. २४ रोजी बैठक झाली होती. या बैठकीत ब्रह्मगिरी बचाव कृती समितीचे पदाधिकारी तसेच जिल्हा खनिकर्म अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तसेच मंत्रालयातील काही अधिकारी सहभागी झाले होते. पर्यावरण तसेच जैवविविधतेला धोका पोहोचविण्याचे उद्योग ब्रह्मगिरीसह संतोषा, भागडी तसेच नााशिक जिल्ह्यातील डोंगरांवर सुरू असल्याची वस्तुस्थिती मांडण्यात आली होती.

इकोसेन्सेटिव्ह झोन असतानाही महसूल तसेच वनविभागाचे सर्व नियम मोडीत काढून या ठिकाणी व्यापक उत्खनन सुरू असल्याचे पुरावे कृती समितीने राज्यमंत्र्यांना सादर केले होते. याकामी सर्व पातळीवर नियमांचे झालले उल्लंघन तसेच पर्यावरणाचा होणारा ऱ्हास याबाबतची मांडणी करण्यात आली होती. संतोषा आणि भागडी येथील डोंगर पायथ्याशी उत्खनन करताना जिलेटीनचे स्फोट घडवून आणले जात असल्याचे पर्यावरणमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते.

या तक्रारींची दखल घेत राज्यमंत्री बनसोडे यांनी संबंधित विकासकाची चौकशी करून तथ्य आढळल्यास तत्काळ गुन्हे दाखल करावेत, तसेच याप्रकरणी कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रसंगी कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारादेखील दिला होता. मात्र, इतके होऊनही गेल्या सात दिवसांत चौकशी करण्यात आली नसल्याचा आरोप ब्रह्मगिरी कृती समितीचे पदाधिकारी तसेच बेलगाव ढगा गावचे सरपंच दत्तू ढगे यांनी केला आहे.

--कोट--

आदेशाचे पालन करण्याची अपेक्षा

पर्यावरण राज्यमंत्र्यांनी आदेश देऊनही याप्रकरणाची चौकशी प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. जिलेटीन वापराची परवानगी कुणी दिली, नियमांचा भंग करून जिलेटीनचे स्फोट केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असताना साधी चौकशीही केली नसल्याने प्रशासनाला फारसे गांभीर्य दिसत नाही.

- दत्तू ढगे, सरपंच, बेलगाव ढगा.

Web Title: Ignoring the inquiry even after the order of the environment minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.