घेईन तर स्थायी नाही तर उपाशी
By Admin | Updated: April 15, 2017 01:07 IST2017-04-15T01:07:23+5:302017-04-15T01:07:44+5:30
स्पर्धा : सदस्यांचा पक्षाला इशारा

घेईन तर स्थायी नाही तर उपाशी
नाशिक : येत्या रविवारी (दि.१६) होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत समिती खातेवाटपाबरोबरच विविध समित्यांवरील सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. सर्वच पक्षातील सदस्यांनी स्थायी समिती, बांधकाम समिती आणि त्याखालोखाल जलसंधारण समितीची मागणी केली आहे. अमुक एका समितीवर निवड करा, नाही तर कोणतीही समिती नको, असा इशारा भाजपा व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी त्यांच्या गटनेत्यांना दिल्याचे समजते.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवर आठ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यात संख्याबळानुसार शिवसेनेचे सर्वाधिक २५ सदस्य असल्याने त्यांच्या कोट्यातून तीन सदस्यांची स्थायी समितीवर वर्णी लागण्याची चिन्हे आहेत, तर त्याखालोखाल संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादी व भाजपाने प्रत्येकी दोन सदस्य स्थायीवर पाठविण्याची तयारी केली आहे. कॉँग्रेस किंवा अपक्षातून एक सदस्य स्थायी समितीवर जाऊ शकतो. भाजपाचे सहयोगी सदस्य स्वीकारलेल्या एका सदस्याने आपल्याला गटात विकासकामे करावयाची असून, आपली स्थायी समितीवर वर्णी लावण्यात यावी, अन्यथा आपल्याला कोणतीही समिती नको, असा पावित्रा घेतल्याने भाजपाची डोकेदुखी वाढल्याची चर्चा आहे. त्यातच सातत्याने पक्षातून डावलेले जात असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या एका महिला सदस्यानेही आपली स्थायी समितीवर वर्णी लावण्यात यावी, अन्यथा आपण घरीच बसणे पसंत करू, असा टोकाचा इशारा पक्षाला दिल्याचे समजते. त्यामुळे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी व कॉँगे्रसच्या गटनेत्यांची स्थायी समितीवर वर्णी लागणे अशक्य असल्याची चर्चा आहे. बांधकाम व जलसंधारण समितीसाठी सदस्यांचा ओढा असल्याचे समजते. त्यामुळे रविवारी होणाऱ्या विशेष सभेत सदस्यांची समजून काढत गटनेत्यांच्या नाकीनव येणार असल्याचे कळते.