तासाभराच्या पावसाने २५ फिडर्स फेल
By Admin | Updated: May 29, 2014 00:49 IST2014-05-29T00:45:36+5:302014-05-29T00:49:53+5:30
विजेचा खेळखंडोबा : दोन दिवसांच्या पावसाने विजेचा पुरता बोजवारा

तासाभराच्या पावसाने २५ फिडर्स फेल
विजेचा खेळखंडोबा : दोन दिवसांच्या पावसाने विजेचा पुरता बोजवारा
नाशिक (प्रतिनिधी)- वादळी पावसामुळे कालपासून कोलमडून पडलेली वीज वितरण यंत्रणा काहीशी सावरत नाही तोच आज अवघ्या तासभर झालेल्या पावसामुळे पुन्हा यंत्रणेने मान टाकली आणि संपूर्ण शहर अंधारात गेले. काही वेळेतच वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला असला तरी रात्री नऊ वाजेपर्यंत अर्ध्याअधिक शहरात अंधार पसरला होता.
काल झालेल्या वादळीवार्यामुळे शहरातील संपूर्ण वीज वितरण यंत्रणा कोलमडून पडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. विजेअभावी नागरिकांचे हाल झाले, तर अनेकांना रात्र अंधारात काढावी लागली. त्यातच वीज कंपनीच्या अधिकार्यांकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने विजेची नेमकी काय परिस्थिती आहे याची माहिती मिळत नसल्याने नागरिकांच्या त्रासात अधिकच भर पडली. काल शहरात खंडित झालेला वीजपुरवठा काही ठिकाणी सुरळीत झाला; मात्र अनेक ठिकाणी आज दुपारपर्यंतही वीज सुरळीत होऊ शकली नाही. त्यातच आज दुपारच्या सुमारास वार्यासह जोरदार पाऊस झाल्यानंतर संपूर्ण शहरातील यंत्रणा पुन्हा कोलमडून पडली.
अवघ्या तासाभराच्या पावसामुळे शहरातील तब्बल २५ फिडर्स नादुरुस्त झाले. गंगापूर, मखमलाबाद, जेलरोड, नाशिकरोड, द्वारका, पाथर्डी, राणेनगर, इंदिरानगर येथील फिडर्स नादुरुस्त झाल्याने या फिडर्सवरील हजारो ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला, तर वीजतारा निखळल्यामुळे सिडको, सातपूर, गंगापूररोड, टिळकवाडी, शरणपूररोड, कॉलेजरोड परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले. ठक्कर बझार, अशोकस्तंभ आणि पंचवटी येथील फिडर्सदेखील नादुरुस्त झाल्यामुळे अर्धेअधिक शहर पुन्हा एकदा अंधारात लोटले गेले. रात्री नऊ वाजेपयंर्त शहरातील बहुतांश भागात वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता.
१३९ खांब जमीनदोस्त, लाखोंचे नुकसान
मंगळवारी झालेल्या वादळी पावसामुळे महावितरणचे तब्बल १३९ खांब जमीनदोस्त झाले. यामुळे महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नाशिक शहर-१ आणि शहर-२ मधील अतिउच्च दाब आणि लघुदाब वाहिन्यांचे खांब कोसळण्याच्या घटना घडल्या. उच्चदाब वाहिनीचे ६३ तर लघुदाब वाहिनीचे ७६ खांब पडल्याने मोठ्या प्रमाणात यंत्रणा कोलमडून पडली. साधारणपणे दोन किलोमीटरपर्यंतच्या उच्चदाब वाहिनी तर १.६२ कि.मी पयंर्त लघुदाब वाहिन्या पडल्याने या वाहिन्या दुरुस्तीच्या कामाला विलंब झाला. एका ठिकाणी विद्युत डीपी जळाली तर तीन फिडर्स नादुरुस्त झाल्याने वीज कंपनीचेही मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. वितरण प्रणालीच्या दुरुस्ती कामासाठी मजूर, वाहने आणि इतर साहित्यांसाठी कंपनीला तब्बल ३.७५ लाखांचा खर्च आला. उच्चदाब खांब पडल्याने ५.२९ लाख, लघुदाब खांब पडल्याने ४.४ लाख इतके नुकसान झाले, तर लघुदाब वाहिनी पडल्याने १.६२ लाख तर उच्चदाब वाहिनी दुरुस्तीसाठी ७९ हजार इतका खर्च आला. तीन ट्रान्सफार्मर दुरुस्तीचा खर्च ६० हजार, तर डीपी दुरुस्तीवर २५ हजाराचा खर्च महावितरणला आला.