विना हेल्मेट दुचाकीस्वारांची ‘शाळा’
By Admin | Updated: January 12, 2017 01:06 IST2017-01-12T01:06:02+5:302017-01-12T01:06:15+5:30
निबंधलेखन स्पर्धा : ‘फायदे कळतात; पण वळत नाही’ हे मोहिमेतून अधोरेखित

विना हेल्मेट दुचाकीस्वारांची ‘शाळा’
नाशिक : मुळात ज्यांनी हेल्मेट वापराकडे दुर्लक्ष करीत दुचाकी रस्त्यावर आणल्या, अशा दुचाकीस्वारांची जेव्हा वाहतूक पोलिसांनी ‘शाळा’ भरविली तेव्हा मात्र त्यांनी ‘हेल्मेट चे फायदे’ या विषयावर मुद्देसूद निबंधलेखन केले, अशा बहाद्दरांचे निबंध पोलीस अधिकाऱ्यांनी वाचले तेव्हा तेदेखील अवाक् झाले. हेल्मेटविषयीचे ज्ञान असून त्याच्या वापराकडे दुर्लक्ष नाशिककर का करतात, असा प्रश्न यावेळी पोलिसांना पडला. ‘हेल्मेटमुळे संरक्षण होते’, ‘अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होत नाही’, ‘हेल्मेटमुळे दुचाकीस्वाराचे प्राण वाचते’, ‘वायू प्रदूषणापासून संरक्षणासाठी हेल्मेट उत्तम...’ असे मत शाळकरी विद्यार्थ्यांनी नोंदविले तर त्यात नावीन्य नाही; मात्र हे विचार जे नाशिककर हेल्मेट वापरत नाही त्यांनी स्वत:च्या शब्दांमध्ये व्यक्त केले हे विशेष! निमित्त होते, ‘त्या’ नाशिककरांसाठी वाहतूक पोलिसांनी आयोजित केलेल्या ‘हेल्मेटचे फायदे’ या विषयावरील निबंध स्पर्धेचे. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सुरक्षित वाहतुकीसाठी नियमांचे पालन व त्याबाबत जनजागृती करण्यावर शहर वाहतूक विभागाकडून भर दिला जात आहे. वाहतूक पोलिसांनी बुधवारी (दि. ११) सकाळी मुंबई नाका येथे असाच एक प्रबोधनपर अभिनव उपक्रम निबंध स्पर्धेच्या माध्यमातून राबविला. नाशिककरांना ‘हेल्मेट’ कळतेय पण वळत नाही, असे यावेळी अधोरेखित झाले.
हेल्मेटचा वापर कायद्याने बंधनकारक आहे. यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे हेल्मेटच्या वापरामुळे रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी होण्यास मदत होते. नागरिकांनी किमान आपला व आपल्या कुटुंबीयांचा विचार करून हेल्मेटचा वापर दुचाकी चालविताना करणे गरजेचे आहे, असे आवाहन पोलीस उपआयुक्त विजय पाटील, लक्ष्मीकांत पाटील यांनी यावेळी वर्गात केले. सहायक आयुक्त जयंत बजबळे, पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, शंकर काळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला. (प्रतिनिधी)