हरसूल दंगलीतील आरोपींना कोठडी
By Admin | Updated: July 20, 2015 23:56 IST2015-07-20T23:51:17+5:302015-07-20T23:56:39+5:30
कारवाई : उर्वरित आरोपींना आज हजर करणार

हरसूल दंगलीतील आरोपींना कोठडी
नाशिक : हरसूल आणि ठाणापाडा येथे उसळलेल्या दंगलीप्रकरणी अटकेत असलेल्या ९० आरोपींपैकी ४३ संशियतांना आज न्यायालयाने न्यायलयीन कोठडी सुनावली. दरम्यान, हरसूल आणि ठाणापाडा येथील जनजीवन आता पूर्वपदाकडे येत असून, दैनंदिन व्यवहार सुरु ळीत होत असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.
युवकाच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल न करता आकस्मिक मृत्यूची नोंद करून संशियतांना पोलीस पाठिंबा देत असल्याचा आरोप करीत हरसूलवासीयांनी दि. १४ रोजी बंद पुकारला होता. या बंदला हिंसक वळण लागल्याने हरसूलमध्ये दंगल उसळली होती. त्यात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका युवकाचा मृत्यूही झाला, तर गावकऱ्यांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले होते. यानंतर कडक कारवाई करीत पोलिसांनी दंगलीत सहभागी झालेल्यांवर खुनाचा प्रयत्न, दंगल पसरवणे, जाळपोळ, लूटमार आदि गुन्हे दाखल केले होेते. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारपासून ९० हून अधिक नागरिकांना अटक केली होती. त्यांतील सुमारे ४३ संशियतांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. २०) पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी ही मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा एस. जे. भोर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. परंतु ती नाकारत न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालीन कोठडीत केल्याने वैद्यकीय चाचणी करून त्यांनी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले.
गृहराज्यमंत्र्यांनी संशियतांवर कठोर कारवाईचा इशाराही दिल्याने दंगलग्रस्त भागात शांतता आहे. पोलिसांनी बंदोबस्त अद्याप कायम ठेवला असल्याने येथील परिस्थिती आता पूर्वपदावर येऊ लागली आहे.