गुरु नानकजींची ५५०वी जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:49 IST2019-11-13T00:48:23+5:302019-11-13T00:49:26+5:30
श्री गुरुनानक देवजी सेवाच्या वतीने श्री गुरुनानक देवजी यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त मंगळवारी गुरुद्वारांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम प्रचंड उत्साहात पार पडले.

गुरु नानकजींची ५५०वी जयंती उत्साहात
नाशिक : श्री गुरुनानक देवजी सेवाच्या वतीने श्री गुरुनानक देवजी यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त मंगळवारी गुरुद्वारांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम प्रचंड उत्साहात पार पडले. कीर्तन,भजन, प्रवचन आणि श्री गुरु ग्रंथ साहिबच्या पठणाच्या अखंड पाठचीही सांगता झाल्यानंतर लंगरसह प्रसादाचे वितरण करण्यात आले.
शहरातील शीख बांधवांकडून भक्तिमय वातावरणात फेरीच्या आयोजनासह अखंड पाठ, शबद कीर्तन तसेच लंगरचे आयोजन करण्यात आले होते. गुरुद्वारांच्या वतीने विविध व्यवस्थापन समित्यांनी उपक्रमांचे आयोजन केले होते. त्यासाठी गुरुद्वारांमध्ये देशाच्या अन्य भागांमधून कीर्तनी जथ्थे दाखल झाले होते. तसेच विविध कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रभात फेरी, अखंड पाठ, कीर्तन आदींचे आयोजन करण्यात आले होते. आठवडाभरापासून दररोज शहरातील देवळाली कॅम्प, नाशिकरोड, शिंगाडा तलाव,
पंचवटी, हिरावाडी येथील गुरुद्वारांनी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. गुरुनानक जयंतीनिमित्त महानगरातील हजारो शिखबांधव महानगरातील गुरुद्वारांमध्ये सहभागी झाले होते. तसेच गुरुद्वारांना रोषणाईने सजविण्यात आले आहे. शिंगाडा तलावच्या गुरुद्वारामध्ये तर गुरुद्वाराच्या बाहेरदेखील भव्य स्क्रीन लावून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्याशिवाय रक्तदान शिबिर, दंतचिकित्सा कॅम्प, मॅमोग्राफी शिबिर यांसह विविध सामाजिक उपक्रमदेखील वर्षभरात आयोजित करण्यात आले होते. शिंगाडा तलाव येथील गुरुद्वारात ओमवीर सिंग, प्रभलीन कौर आणि जगदीपसिंग या कीर्तनी जथ्थ्याने विविध भजने आणि कीर्तने सादर करीत सेवा अर्पण केली.
प्रदूषणविरहित उत्सव
वायु हा गुरू, पाणी हा पिता आणि धरती ही आई असल्याचे आपली संस्कृती सांगते. त्यामुळे या तिघांची कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही, अशाच प्रकारे उत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय सर्व गुरुद्वारा प्रबंधक समित्यांनी घेतला होता. त्यानुसार स्वच्छतेवर भर देत फटाक्यांविना आणि प्रदूषणविरहित उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री गुरु नानकजी यांच्या जयंतीनिमित्त शीख धर्मीयांचा सर्वोच्च पवित्र ग्रंथ मानल्या जाणाऱ्या गुरु ग्रंथ साहिबच्या पठणाला तीन दिवसांपूर्वीच प्रारंभ करण्यात आला होता. तीन दिवस त्याचे पठण झाल्यानंतर मंगळवारी सकाळी या पाठाची समाप्ती करण्यात आली. या ग्रंथामध्ये श्री गुरु नानकजी यांच्या वचनांचा अंतर्भाव आहे. पठणाचा समारोप झाल्यानंतर आरती करुन अखंड पाठाची सांगता करण्यात आली.