हिरवा वटाणा, गाजराची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 16:38 IST2018-11-23T16:38:17+5:302018-11-23T16:38:43+5:30
हिवाळ्याच्या कालावधीत वाटाणा तसेच गाजराला ग्राहकांकडून मोठी मागणी असल्याने नोव्हेंबर महिन्यात दरवर्षीच बाजारभावात घसरण होत असल्याचे नाशिक कृषी बाजारसमितीतील भाजीपाला व्यापा-यांनी सांगितले. ग्राहकांना किरकोळ बाजारात वाटाणा ३५ रुपये तर गाजर १५ रुपये किलो दराने विक्री होत आहे.

हिरवा वटाणा, गाजराची आवक वाढली
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत हिरवा वाटाणा तसेच गाजराची आवक वाढल्याने अन्य सर्वच फळभाज्यांचे बाजारभाव घसरलेले आहेत. पंधरवड्यापूर्वी शंभर रुपये प्रति किलो असा दर गाठणाऱ्या वाटाण्याचे दर शुक्रवारी ३५ रुपये किलोवर आल्याने तसेच नाशिकसह राज्यातील अन्य सर्वच बाजारपेठेत स्थानिक शेतमाल सुरू झाल्याने बाजारभाव घसरले आहेत. मुंबईच्या बाजारात पर राज्यातील माल मोठ्या प्रमाणावर आयात झाल्यामुळे नाशिकच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे.
हिवाळ्याच्या कालावधीत वाटाणा तसेच गाजराला ग्राहकांकडून मोठी मागणी असल्याने नोव्हेंबर महिन्यात दरवर्षीच बाजारभावात घसरण होत असल्याचे नाशिक कृषी बाजारसमितीतील भाजीपाला व्यापा-यांनी सांगितले. ग्राहकांना किरकोळ बाजारात वाटाणा ३५ रुपये तर गाजर १५ रुपये किलो दराने विक्री होत आहे. नाशिक बाजारसमितीतून मुंबई शहर व उपनगरात दैनंदिन मोठ्या प्रमाणात भाजीपाला मालाची निर्यात केली जाते मात्र गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत भाजीपाल्याचे दर कोसळलेले आहेत. मुंबई शहरात मध्यप्रदेश तसेच गुजरात राज्यातील शेतमाल मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागल्याने आणि त्यातच हिरवा वाटाणा व गाजर आवक वाढल्याने बाजारभाव घसरले आहे. वर्षभरात नोव्हेंबर पासून काही महिने वाटाणा बाजारात विक्रीसाठी येत असतो. नागरिक दररोज भाजीपाला खातात मात्र वाटाणा वर्षभरातून एकदाच येणारे पीक असल्याने व अन्य पालेभाज्यापेक्षा हंगामात स्वस्त मिळत असल्याने ग्राहक वाटाणा व गाजराला पसंती देतात. त्यामुळे सर्वच फळभाज्यांचे बाजारभाव नोव्हेंबर महिन्यात कोसळतात.
नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत मध्यप्रदेश, इंदूर, आणि ग्वाल्हेर या भागातून सध्या मोठ्या प्रमाणात हिरवा वाटाणा विक्रीसाठी दाखल होत आहे पंधरवड्यापूर्वी १२० रुपये प्रति किलो दराने वाटाणा विक्री झाल्याचे बाजारसमितीच्या सूत्रांनी सांगितले. हिवाळ्याच्या कालावधीत नागरिक वाटाणा गाजर तसेच फ्लॉवर मोठ्या प्रमाणात ग्रहण करत असल्याने इतर फळभाज्यांचे बाजारभाव घसरतात.