चार महिन्यांपासून ग्रामसेवकाची दांडी
By Admin | Updated: August 8, 2014 00:53 IST2014-08-07T21:58:22+5:302014-08-08T00:53:50+5:30
चार महिन्यांपासून ग्रामसेवकाची दांडी

चार महिन्यांपासून ग्रामसेवकाची दांडी
पाथरे : नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या कोळगावमाळ ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक गेल्या चार महिन्यांपासून आला नसल्याची तक्रार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामसेवक नसल्याने गावाचा विकास खुंठला असून, विद्यार्थी व नागरिकांची विविध दाखल्यांसाठी अडचण निर्माण झाल्याचे चित्र आहे.
गेल्या चार महिन्यांपासून ग्रामसेवक येत नसल्याने ग्रामस्थ, विद्यार्थी ग्रामपंचायत कार्यालयात विविध दाखले व उताऱ्यासाठी हेलपाटे मारत आहेत. सदर ग्रामसेवक कामावर येत नसल्याची लेखी तक्रार पंचायत समितीचे सभापती व गटविकास अधिकाऱ्यांकडे करूनही कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे सरपंच निवृत्ती कुमावत, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
कोळगावमाळ ग्रामपंचायतीत एस. एस. सोनवणेनामक ग्रामसेवक कार्यरत असून, त्याने ग्रामपंचायत कार्यालयातील महत्त्वाची रजिस्टर व कागदपत्रे घेऊन गेल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांना आवश्यक असणारी दाखले मिळत नाही. ग्रामसेवकाअभावी गावाचा विकास आराखडा तयार करता येत नाही. एकाही कामाचा प्रस्ताव नाही. शासकीय योजना व अनुदानापासून गाव वंचित असल्याची तक्रार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली आहे. ग्रामसेवक नसल्याने गावातील स्वच्छता व शासनामार्फत राबविले जाणारे विविध उपक्रम रखडले
आहेत.
एखाद्या ग्रामपंचायतीला चार महिने ग्रामसेवक नसेल तर पंचायत समिती प्रशासन व लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. तथापि, तसे केले जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. कोळगावमाळ ग्रामपंचायतीसाठी तातडीने ग्रामसेवक नियुक्त करण्याची मागणी सरपंच निवृत्ती कुमावत, वामन चंद्रे, नकुल पवार, अन्वर पटेल, अमिना पटेल, मीराबाई मोरे, ललिता कुमावत, प्रतिभा मोकळ, रवी भालेराव, कैलास मोकळ, सर्जेराव चंद्रे, छबूराव कदम, बाळासाहेब कदम आदिंसह ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)