प्रवाशांची प्रथम पसंती : ग्रामीण भागात लोकप्रिय, नियमित निगराणीची गरज महामंडळासमोर ‘शाही’पणा राखण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:10 IST2018-04-11T00:10:23+5:302018-04-11T00:10:23+5:30
ओझर : परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सामील शिवशाही बसेस स्वस्तात मस्त मिळत असलेल्या सुविधांमुळे ग्रामीण भागात लोकप्रिय ठरत आहे.

प्रवाशांची प्रथम पसंती : ग्रामीण भागात लोकप्रिय, नियमित निगराणीची गरज महामंडळासमोर ‘शाही’पणा राखण्याचे आव्हान
ओझर : राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सामील झालेल्या शिवशाही बसेस स्वस्तात मस्त मिळत असलेल्या सुविधांमुळे ग्रामीण भागात अत्यंत लोकप्रिय ठरत असून, प्रवासी खूश असले तरी या बसेसची इतर गाड्यांप्रमाणे दुरवस्था होऊ नये, या बसेसचा शाहीपणा टिकवायचा असल्यास त्यांची स्वच्छता, काळजी घेण्याचे आव्हान महामंडळापुढे आहे. एसटीचे रूप आतापर्यंत सामान्य माणसाने पाहिले. तिचं अथांग पसरलेलं जाळं ही सर्वात जमेची बाजू आहे. सुरुवातीच्या काळात सुरू झालेला लाल डबा संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलाय. अनेक वर्षे बसचे एकच रूप पाहत आलेले प्रवासी बदलत्या काळानुसार लाल रंगाची बस, एशियाड, हिरकणी, शीतल, शिवनेरी आणि आताची शिवशाही इतक्या स्वरूपात सेवेत उतरली. परंतु सुरुवातीला अतिशय देखणी वाटणारी एसटी रस्त्यावरून चालता चालता इतक्या लवकर जीर्ण का होत जाते हा खरा अभ्यासाचा मुद्दा आहे. बहुतेक गाड्यांमध्ये चालकाच्या उजव्या पायाजवळ थुंकीचे थर दिसतात. तीच परिस्थिती बहुतेक सीटच्या पाठीमागील बाजूस कोपºयात दिसते. कुठे काच उघडत नाही. असे अनेक न पटणारे प्रकार प्रवासी सहन करत आहेत. सध्या कॉर्पोरेट जगात सर्वात लोकप्रिय प्रवासी साधन शिवशाही असल्याचे ठळकपणे दिसून येते आहे. अनेक प्रवासी चौकशी खिडकीवर प्रथम ‘शिवशाही’ बसला प्राधान्य देताना दिसतात. सदर बस पूर्णपणे वातानुकूलित आहे. हिरकणीच्या दरात शिवशाहीचा थंडगार प्रवास म्हणजे पैसे वसूल हीच बहुतेकांची मानसिकता होताना दिसते आहे. पुणे, बोरिवली, औरंगाबाद, तुळजापूर, अहमदनगर, मुंबई, धुळे, नंदुरबार इत्यादी ठिकाणी चालणाºया बसेस चांगले उत्पन्न मिळवून देत आहेत. काही ठिकाणी रस्त्यांची झालेली वाताहत सोडली तर प्रत्येक विभागाने ह्या बसेसची देखभाल-दुरुस्ती चोख ठेवण्याची गरज आहे. याची सुरुवात चालक-वाहक यांनी करण्याची गरज आहे. पान, तंबाखू खाणाºयांना मज्जाव केला पाहिजे. डेपोत गाडी जमा करताना देखरेख पथकाकडून पाहणी होणे गरजेचे आहे. आज सामान्य माणसाची हक्काची असणारी एसटी कॉर्पोरेट पेहराव घालत असताना, ती कायस्वरूपी कशी देखणी, सुंदर व सुदृढ राहील याची प्रत्येकाने काळजी घेतल्यास आपोआप प्रवाशांचा वाढता कल कायम राहील अन् एसटी खºया अर्थाने आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, हे निश्चित. शिवशाही बसने ग्रामीण भागातील स्थानकांत येण्याची गरज आहे. काही बसस्थानकांचा अपवादवगळता राज्य व राष्ट्रीय महामार्गावर मोठी लोकसंख्या असलेली कित्येक गावं आहेत, ज्यांना आदळआपट करतच प्रवास करावा लागतो. त्यांच्या नशिबी शाहीपणा कधी येणार, हा सामान्य नागरिकाला पडलेला मोठा प्रश्न सुटल्यास एसटीचे ‘अच्छे दिन’ कुणीही रोखू शकणार नाही, हे निश्चित.