खतप्रकल्पामुळे दुर्गंधी
By Admin | Updated: April 17, 2017 00:42 IST2017-04-17T00:42:12+5:302017-04-17T00:42:36+5:30
मनपाचे दुर्लक्ष : कचऱ्यामुळे श्वास घेण्यास त्रास; नागरिक वैतागले

खतप्रकल्पामुळे दुर्गंधी
पाथर्डीफाटा : पाथर्डी शिवारातील खतप्रकल्पाचे खासगीकरण करूनही परिसरातील नागरिकांचा त्रास कमी होण्याऐवजी वाढलेला दिसून येतो आहे. खतप्रकल्पातून दररोज सकाळी प्रचंड धूर व दुर्गंधी परिसरात लांबवर पसरत असल्याने शेजारील वस्ती, महामार्गावरून जाणारे - प्रवासी व नेहरू उद्यान, पांडवलेणी परिसरातील नागरिकांना श्वास घेताना गुदमरायला होते आहे. मनपा प्रशासनाने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष पुरवून परिसर धूर व दुर्गंधीमुक्त करावा, अशी मागणी होत आहे.
खतप्रकल्पाचे दुखणे मनपाला पेलवले न गेल्याने खासगी कंपनीला चालविण्यासाठी दिला गेला आहे. आतातरी परिसर समस्यामुक्त होईल असा परिसरातील नागरिकांच्या अपेक्षा होत्या. मात्र अलीकडे रोज सकाळी खतप्रकल्पाच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमधून निघणाऱ्या प्रचंड धुरामुळे आसमंत व्यापून जातो आहे. कित्येक कि. मी. लांब दाट धुके पसरावे तसा हा धूर पसरतो. पांडवलेणी व नेहरू वनोद्यानातील वन्यजीव पक्षांना या धुराचा मोठा त्रास होण्याची शक्यता आहे. या धूर व दुर्गंधीमुळे पांडवलेणीच्या निसर्गरम्य परिसरात भल्या सकाळी फिरायला, व्यायाम करायला, ट्रेकिंगला येणाऱ्या नाशिकच्या विविध भागांतील नागरिकांना प्रचंड त्रास होतो आहे. श्वास गुदमरत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. या प्रकल्पाजवळच गौळाणे रोड, वीटभट्टी परिसर, पाथर्डी मळे वस्ती, वाडीचे रान आदी भागांतील नागरिकांचे आरोग्य त्यामुळे धोक्यात आले आहे. हा त्रास आणखी किती दिवस सहन करावा लागणार, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. त्यावर त्वरित उपाय योजना करण्याची मागणी रवींद्र कदम, बी. व्ही. गायकवाड, सुभाष पवार, माणिक भदाणे, विनायक नवसुपे, सुरेश शिंदे आदींनी केली आहे.