गाजरगवत काढताना शेतकऱ्यांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 05:47 PM2019-11-13T17:47:24+5:302019-11-13T17:48:36+5:30
कवडदरा : यावर्षी झालेल्या परतीच्या जोरदार पावसाने शेतीसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतीकामांना गती मिळाली असून, इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना गाजरगवत काढताना कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पावसामुळे शेतात गवत मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. शेत हिरवेगार दिसत आहे. पीक काढून रिकामे झालेल्या शेतात गवत वाढले आहे. शेतीची मशागत करण्याचा प्रश्न शेतक-यांसमोर उभा ठाकला आहे. गवताचे प्रमाण शेतामध्ये खूप आहे. हे गवत जनावरांना खाण्यायोग्य नसून त्यापासून अॅलर्जीसुद्धा होत आहे. आता शेतकºयांपुढे मशागतीचे आव्हान आहे. काही शेतकरी तणनाशकाचा प्रयोग करीत असून नाहक आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. तणनाशक औषधांचाही फारसा प्रभाव गवतावर होत नाही. काही दिवस वाढ खुंटल्यानंतर पुन्हा जोमाने गवत वाढू लागते. दीपावली दरम्यान झालेल्या पावसामुळे शेतात गवत वाढले आहे. आगामी काळात शेतकरी गहु, बटाटे, कांदा, ऊस, हरभरा पेरणी करणार आहेत. मात्र, शेतातील तणामुळे शेतकरी हतबल झाला आहे. काही शेतकरी तणनाशक फवारत आहेत.फवारणीनंतर तणाचा नाश होण्यासाठी काही दिवस थांबावे लागत असल्याने दुप्पट खर्च होत आहे.